Headlines

काय सांगता! खिशात कांदा ठेवल्याने उष्माघात टाळता येतो? वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात…

काय सांगता! खिशात कांदा ठेवल्याने उष्माघात टाळता येतो? वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात…
काय सांगता! खिशात कांदा ठेवल्याने उष्माघात टाळता येतो? वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात…


सध्या देशाच्या अनेक भागांत उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. अनेक नागरिक कडक उन्हापासून वाचण्यासाठी विविध उपाय करत आहेत. अलीकडेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत त्यांनी उष्माघातापासून बचावासाठी खिशात कांदा ठेवण्याबद्दल सांगितले होते. त्यामुळे पुन्हा एकदा ही जुनी पारंपरिक पद्धत चर्चेत आली आहे. पण खरंच उष्माघातापासून वाचायचे असेल तर खिशात कांदा ठेवणे उपयोगी असते का याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

काय आहे जुनी मान्यता?

ग्रामीण भागात अनेक पिढ्यांपासून असा समज आहे की कांदा उष्णता शोषून घेतो. त्यामुळेच घराबाहेर पडताना वडीलधारी मंडळी खिशात छोटा कांदा ठेवण्याचा सल्ला देतात. असे केल्याने सूर्याच्या प्रखर उष्णतेचा शरीरावर परिणाम होत नाही, अशी श्रद्धा आजही कायम आहे.

तर वैद्यकीय तज्ञांच्या मते, या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. जेव्हा शरीराचे अंतर्गत तापमान खूप वाढते आणि शरीराची नैसर्गिक शीतकरण प्रणाली (घाम येणे) कोलमडते, तेव्हा उष्माघात होतो. डॉक्टरांच्या मते, कांदा केवळ खिशात ठेवल्याने शरीराच्या तापमानावर कोणताही फरक पडत नाही. कांद्यामधील घटक केवळ त्याच्या सेवनातूनच फायदेशीर ठरतात. खिशात कांदा ठेवल्याने केवळ मानसिक समाधान मिळू शकते, ज्याला वैद्यकीय भाषेत प्लेसिबो इफेक्ट म्हणतात, पण प्रत्यक्षात तो उष्णता शोषून घेत नाही.

कांद्याचे खरे फायदे काय?

कांदा खिशात ठेवण्यापेक्षा त्याचे सेवन करणे अधिक गुणकारी आहे. त्यात अनेक उपयुक्त घटक असतात. कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी६, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. तसेच क्वेरसेटिन (Quercetin) मुळे शरीरातील दाह (सूज) कमी होण्यास मदत होते. कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तो उन्हाळ्यात शरीरातील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करतो.

उष्माघातापासून वाचण्यासाठी योग्य उपाय

भरपूर पाणी प्या: तहान लागलेली नसली तरीही थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहा.

नैसर्गिक पेयांचा वापर: नारळ पाणी, ताक, लिंबू सरबत यांचा आहारात समावेश करा.

फळांचे सेवन: टरबूज, काकडी यांसारख्या पाण्याने समृद्ध फळांचे सेवन करा.

योग्य पेहराव: बाहेर पडताना सैल, सुती आणि हलक्या रंगाचे कपडे घाला.

वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो कडक उन्हात बाहेर पडणे टाळा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *