
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा वाढला असून पुढील पाच दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईच्या मरिन ड्राइव्ह क्वीन नेकलेसवर लोकांची वर्दळ कमी झाली. मुंबईत पुढील चार दिवस तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांताक्रुझ वेधशाळेत किमान 28 आणि कमाल 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून मंगळवार आणि बुधवारीही अशीच स्थिती राहण्याचा अंदाज आहे. गुरुवारी तापमान किंचित घटून 33 अंशांवर येईल, तर आठवड्याअखेर सरासरी तापमान 34 अंश राहण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने दुपारच्या वेळेत कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने नागरिकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना (एसओपी) जारी केल्या आहेत.
विशेषत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात किंवा उन्हात एकटे सोडू नये, असा कडक इशाराही देण्यात आला आहे. शक्यतो घरात राहून सावलीत वेळ घालवण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण राज्यातच उष्णतेची लाट आहे.
सकाळी किंवा दुपारी थेट सूर्यप्रकाश येणाऱ्या खिडक्यांवर पडदे किंवा शेड्स लावावेत, तसेच स्थानिक हवामानाचा अंदाज नियमितपणे तपासावा, असे सूचित करण्यात आले आहे. शक्यतो घरात राहून थेट उन्हात जाणे टाळावे. वातानुकूलन सुविधा नसल्यास घराच्या खालच्या मजल्यावर किंवा सावलीच्या ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळा. उन्हातून आल्यावर थोडाजरी त्रास झाला तरीही लगेचच डॉक्टरांसोबत संपर्क साधा.
मुंबईसह विदर्भातही स्थिती गंभीर आहे. विदर्भात 46 अंश सेल्सिअसच्या पुढे पारा जाताना दिसला. आजही मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आला. पुढील काही दिवस मुंबईसह राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना महत्वाचे आवाहन देखील केले. अनेक शहरांमध्ये शाळा, महाविद्यालय आणि कोचिंच क्लासेसच्या वेळही बदलण्यात आल्यात.