
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळात आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नरगिस यांचे जीवन एखाद्या भावनिक चित्रपटापेक्षा कमी नव्हते. अपूर्ण प्रेम, प्रचंड स्टारडम, वैयक्तिक आयुष्यातील कठीण निर्णय आणि शेवटच्या काळातील वेदना या सगळ्यांनी त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच छटा दिली.
‘नर्गिस’ म्हणजे एक सुंदर फूल आणि त्या नावाप्रमाणेच त्यांनी आपल्या सौंदर्याने आणि निरागस अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. अतिशय कमी वयात त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि अवघ्या 20व्या वर्षी त्या हिंदी सिनेमातील सर्वात मोठ्या अभिनेत्री बनल्या.
1948 मध्ये अंदाज या चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट राज कपूर यांच्याशी झाली. त्या आधीच मोठ्या स्टार होत्या तर राज कपूर आपल्या करिअरच्या उंचीवर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि जवळपास 9 वर्षे त्यांचे नाते टिकले.
मात्र राज कपूर आधीपासूनच विवाहित असल्याने त्यांनी कधीच आपले कुटुंब सोडले नाही. दीर्घ प्रतीक्षेनंतर नर्गिस यांनी हा संबंध संपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी मदर इंडिया हा चित्रपट साइन केला, जो त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली.
आग लागलेल्या सीनमध्ये नरगिस अडकल्या, तेव्हा सहकलाकार सुनील दत्त यांनी जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवले. या घटनेनंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांचे प्रेम फुलले. 11 मार्च 1958 रोजी नरगिस आणि सुनील दत्त यांनी विवाह केला.
1980 साली नरगिस यांना पॅन्क्रियाटिक कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्याच काळात त्यांचा मुलगा संजय दत्त याचा पहिला चित्रपट रॉकी तयार होत होता. त्यांनी या चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र प्रकृती खालावल्याने 2 मे 1981 रोजी त्या कोमामध्ये गेल्या आणि 3 मे रोजी त्यांचे निधन झाले.