
डोंबिवली परिसरात अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरात जोरदार वारे वाहत असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे रस्त्यांवरील धूळ हवेत उडाल्याने अनेक भागांमध्ये दृश्यमानता कमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील काही उंच इमारती धुळीच्या ढगांमध्ये झाकल्या गेल्याचे दिसून आले. अचानक निर्माण झालेल्या या वातावरणीय बदलामुळे नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी जोरदार वाऱ्यांमुळे आणि धुळीमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाकडून पुढील काही तासांत वातावरणात आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.