
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि गगनाला भिडलेले सोन्याचे दर यामुळे आधीच ग्राहक सोन्याकडे पाठ फिरवत होते. त्यातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी न करण्याचे आवाहन केल्याने पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये सराफ बाजारात मोठा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. लग्न सराई आणि यात्रांचा हंगाम असूनही दुकानात ग्राहकांनी पाठ फिरवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
सध्या सर्वत्र लग्नसराई आणि जत्रा-यात्रांचा हंगाम सुरू आहे. तरीही दागिन्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी नाहीए. पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असला तरी, याचा थेट फटका सराफ व्यावसायिकांना बसला आहे. आधीच नोटबंदी आणि लॉकडाऊनचा मोठा तोटा सहन केलेल्या या व्यावसायिकांसमोर आता बँकेचे कर्ज आणि कामगारांचे पगार कसे द्यायचे, हे मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. यावर सरकारने काहीतरी विचार करावा, अशी मागणी व्यावसायिक करत आहेत.
सराफ व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही
पीएम मोदी यांच्या आवाहनानंतर आमच्या सराफ व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही. सोने आणि संस्कृती यांचे एक नाते आहे.सध्या सोन्याचे भाव स्थिर आहेत, त्यामुळे आमच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही. सोने हे सुरक्षित ठेव आहे, त्याचा परतावा पण चांगला मिळतो. मात्र आमच्या व्यापारी वर्गात कोणताही संभ्रम नाही. लोक सोने खरेदी करतील अशा विश्वास पुण्यातील सराफ असोसिएशन उपाध्यक्ष अभय गाडगीळ यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांचे हे अपयश आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोने खरेदी न करण्याच्या आवाहनाला सराफ व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. पंतप्रधानांनी आवाहन केले असले तरी त्यांनी सराफ व्यापाऱ्यांचा विचार केलेला नाही. सोने व्यापारातील पहिला फटका कामगारांना बसणार आहे. सोने व्यापारी वर्षभर सोना नाही विकले तरी जगू शकतात, मात्र कारागिरांनी कसे जगायचे ? पंतप्रधानांचे हे अपयश आहे कारण गेली दहा वर्षे ते पंतप्रधान आहेत.दहा वर्षात ते व्यापारात सक्षम होऊ शकले नाहीत का? सोने म्हणजे ऐनवेळी मदतीला येणार दागिना आहे त्यामुळे लोक सोने खरेदी बंद करणार नाहीत असे सराफांनी म्हटले आहे.
देशभक्त आम्ही सुद्धा आहोत, पण कुणाचे रोजी रोटी जायला नको
नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोनं खरेदी करू नका असे म्हटले आहे. पण आमच्या सवाल आहे की देशभरामध्ये जे तीन कोटी कारागीर ज्यांचा उदरनिर्वाह ज्वेलरी मेकिंगने होतो त्यांचं नेमकं काय होणार ? तीन कोटी कारागीर सोने तयार करतात आणि देशभरामध्ये त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पंतप्रधान मोदी यांच्या या विधानामुळे निर्माण झाला आहे. आम्ही या विधानाचे स्वागत करतो ,पण आम्ही यातून मार्ग काढलेला आहे, आम्हाला असं वाटतं की सध्या गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये कोणी गुंतवणूक करू नका लग्नसराई असेल तर मात्र सोनं बनवा जेणेकरून त्यावर आमचाही रोजी रोटी सुरू राहील असे ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान यासाठी केले आहे. कारण पश्चिम आशियाई देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती अजून देखील संपलेली नाहीए. घरचे दर वाढलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चढ्या किंमतीमध्ये वस्तू विकत घेतल्या जात आहेत आणि त्यामुळेच ही विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे, देशभक्त आम्ही सुद्धा आहोत, पण कुणाचे रोजी रोटी जायला नको ही आमची भूमिका असल्याचेही जैन यांनी म्हटले आहे.
सामान्यांना विलक्षण हालअपेष्टांना सामोरे जावे लागणार
आंतराराष्ट्रीय परिस्थितीचा हा परिणाम अटळ होता. खरं म्हणजे या पूर्वीच सरकारने काही कठोर पाऊले उचलणे आवश्यक होते. पण चार विधानसभा निवडणुका लक्षात घेता सरकारने या संदर्भातील निर्णय पुढे ढकलल्याचे दिसत आहे.प ण पेट्रोल, गॅस, डिझेल, खते, सोन्याची आयात, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह हे सगळे प्रश्न सरकारच्या पुढे आवासून उभे आहेत. अर्थव्यवस्थेसंबधी येणारा काळ म्हणजे अतिशय चॅलेंजिंग असणार आहे. याचे सुतोवाच सरकारने केले आहे. खरं म्हणजे आता गरज आहे ती आर्थिक प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची. पण इतर पक्षांशी मोदी सरकार जे संबध ठेवत आहे ते जर लक्षात घेतले तर ही सहमती घडून येण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात सामान्य माणसाला विलक्षण हालअपेष्टांना सामोरे जावे लागणार आहे. हे मात्र नक्की अशी भीती बँकिंग एक्सपर्ट
देविदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केली आहे.
भारतीयांना केले गेलेले आवाहन हे अंत्यत संयुक्तिक –
पंतप्रधान मोदींकडून भारतीयांना केले गेलेले आवाहन हे अंत्यत संयुक्तिक आहे. योग्य वेळी हे आवाहन करण्यात आलेले आहे. आखातामधला संघर्ष अजून सुटलेला नाहीए.स्टेट ऑफ हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. अजूनही स्टेट ऑफ हॉर्मुझमधून अगदी 10 टक्के जहाजं पास होत आहेत. आखाती देशामध्ये परिस्थिती अजूनही स्फोटक आहे.येत्या काळात हा प्रश्न अजून चिघळू शकतो अशी स्थिती आहे.76 देशांमध्ये तेलांच्या किमती वाढल्या आहेत. खुद्द अमेरिकेत तेलाच्या किमती 16 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दुसरीकडे सामान्य भारतीय सोने खरेदीत, डेस्टीनेशन वेडिंग (परदेशात जाऊन विवाह करणे) ला पसंती देत आहे.
केवळ जानेवारी महिन्यात 12 बिलियन डॉलरचे सोने भारतीयांनी आयात केले होते. सोन्याचे आणि तेलाचे व्यवहार प्रामुख्याने डॉलरमध्ये केले जातात. भविष्य़ात आखाती देशातील परिस्थिती आणखी चिघळली तर आपल्याला महागातलं तेल डॉलरमध्ये खरेदी करावे लागणार आहे. रासायनिक खता ऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करण्याचे आवाहन अंत्यत योग्य वेळी करण्यात आले आहे. त्यामुळे हा काळ डॉलरचे सेव्हिंग करण्याचा आहे. हा बचत करण्याचा काळ आहे. त्यामुळे असे आवाहन केले जाणे अंत्यत संयुक्तिक असल्याचे आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी म्हटले आहे.
जळगावातील सराफ व्यावसायिकांचा पाठिंबा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोने खरेदी थांबवा. या आवाहनाला जळगावातील सराफ व्यावसायिकांचा पाठिंबा दिला आहे. “देशहितासाठी मोदींचे आवाहन; प्रत्येकाने सैनिकासारखी साथ द्यावी” या शब्दात जिल्हा सराफ असोसिएशनकडून , कारागीर तसेच सराफ व्यावसायिक यांच्याकडून मोदींच्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. सुवर्णपेढींवर काही प्रमाणात परिणाम जाणवत असला तरी देश प्रथम या भावनेतून प्रत्येक नागरिकाने सैनिकाप्रमाणे मोदीजींच्या आवाहनाला साथ द्यावी,”अशी प्रतिक्रिया जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे सचिव स्वरूप लुंकड यांनी व्यक्त केली आहे.
नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन व्यवसायाविरोधात असल्याचा गैरसमज सोने व्यापारी आणि कारागिरांनीही करून घेऊ नये. मोदी सरकारच्या निर्णयामागे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा उद्देश असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. भारताचे चलन रुपया तसेच अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी मोदींच्या आवाहनाचा मोठा फायदा होईल असे सराफ व्यावसायिक सराफ आकाश भंगाळे यांनी म्हटले आहे.