Headlines

मिरची झोंबणार, टोमॅटो रडवणार, मुंबई-ठाण्यात भाजीपाल्याचे दर गगनाला; आजचा भाव काय?

मिरची झोंबणार, टोमॅटो रडवणार, मुंबई-ठाण्यात भाजीपाल्याचे दर गगनाला; आजचा भाव काय?
मिरची झोंबणार, टोमॅटो रडवणार, मुंबई-ठाण्यात भाजीपाल्याचे दर गगनाला; आजचा भाव काय?


सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. एलपीजी गॅस, दूध, सोने-चांदी यानंतर आता पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर आता मुंबई, नवी मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) कडाक्याच्या उन्हाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या ताटावर होऊ लागला आहे. मुंबईसह एमएमआर परिसरात भाजीपाला ५० टक्क्यांनी महागला आहे. कडक ऊन, पाण्याची टंचाई आणि घटलेल्या आवकीमुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) भाजीपाल्याची आवक २० ते ३० टक्क्यांनी घटल्याने किरकोळ बाजारात दर कडाडले आहेत.

वाहतुकीदरम्यान नुकसान

राज्यातील पुणे, सातारा, सोलापूर आणि नाशिक या प्रमुख शेती पट्ट्यांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच सध्या अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याचाही विपरीत परिणाम उत्पादनावर झाला आहे. त्यातच, लांब पल्ल्यावरून येणारा भाजीपाला उष्णतेमुळे वाहतुकीदरम्यान लवकर खराब होत आहे. ज्यामुळे व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

भाजीपाल्याचे नवे दर काय?

भाजीपाला पूर्वीचा दर (₹) सध्याचा दर (₹)
गाजर ४० ६०
कोथिंबीर (जुडी) ४० १००
वांगी ४० ७०
लिंबू (नग) ५ – ७
गवार १२० १६०
भेंडी ३० ६०
टोमॅटो २० – २५ ५० – ६०
कारली ४० ८०
फरसबी १३० – १७० २००
हिरवी मिरची १०० १५०
पापडी / फ्लॉवर १०० – १२०

पावसाळ्यापर्यंत दिलासा मिळण्याची शक्यता कमी

बाजार तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत मान्सूनचे आगमन होऊन नवीन पिकांची आवक सुरू होत नाही, तोपर्यंत भाजीपाल्याचे दर उच्च पातळीवरच राहण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली असून, मे महिन्याच्या अखेरीस ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची चिन्हे आहेत.

घाऊक बाजारात आवक घटली असली तरी किरकोळ विक्रेत्यांकडून अनेक ठिकाणी अव्वाच्या सव्वा दराने भाजी विकली जात असल्याचे चित्र आहे. मुंबईतील दादर, अंधेरी आणि बोरिवली यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे गृहिणींना आपले बजेट जुळवताना मोठी कसरत करावी लागत आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे भाजीपाल्यातील दरवाढ यामुळे ताटातून पालेभाज्या गायब होऊन आता कडधान्यांचा आधार घ्यावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया अनेक ग्राहकांनी व्यक्त केली आहे. त्यातच हॉटेल व्यावसायिकांनीही कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चामुळे पदार्थांचे दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *