
मध्य प्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा वादावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदोर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात एएसआयच्या अहवालाचा आधार घेत भोजशाळेला मंदिर संकुल म्हणून मान्यता दिली. त्यामुळे जवळपास आठशे वर्षांपासून सुरू असलेल्या मंदिर-मशीद वादाला नवे वळण मिळाले आहे.
या निर्णयानंतर हिंदू संघटनांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाच्या निकालापूर्वी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होते.
याआधी 2004 मध्ये देण्यात आलेल्या आदेशानुसार येथे हिंदू आणि मुस्लिम समाजाला वेगवेगळ्या दिवशी प्रार्थना आणि नमाजाची परवानगी होती. मात्र आता उच्च न्यायालयाच्या नव्या निर्णयामुळे भोजशाळा मंदिर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान कोर्टाने हा निकाल देताना २००० पानांचा रिपोर्ट तपासला इतकेच नाही तर वास्तूच्या सर्व रचना आणि गंभीर मुद्दांवर प्रकाश टाकला. अनेक दिवस या प्रकरणाचा खटला सुरु होता. अखेर सर्व पुरावे, दस्ताऐवज तपासल्यावर कोर्टाने हा निर्णय घेतला.