
राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही बातमी थेट अशोक खरातशी संबंधित असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीतील उदय आहेर यांनी मोठा दावा केला आहे. उदय आहेर हे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष असून त्यांनी सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी अशोक खरातचा तटकरेंवर दबाव होता असं स्पष्ट केलं, इतकेच नाही तर माणिकराव कोकाटेंवरील राग काढण्यासाठी त्याने तटकरेंवर दबाव टाकला असं सांगितलं.
आहेर यांनी सांगितलं की, ‘माणिकराव कोकाटे कधीच खरातच्या दरबारात गेले नव्हते. दरबारात काय, कधी संपर्कातही आले नव्हते. अनेक बडे नेते त्याच्या भेटीला यायचे, मात्र माणिकराव कोकाटे कधीच संपर्कात आले नाही याचा खरातला राग होता आणि म्हणूनच त्याने सुनील तटकरे यांना बळजबरीने त्यांचा राजीनामा घ्यायला लावला.’
एकूणच राष्ट्रवादीतील गटातटांचे राजकारण दिवसेंदिवस अधिकच खोल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. उदय आहेर यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे आता पक्षांतर्गत वादात आणखी भर पडली आहे.