
राज ठाकरे यांच्याविरोधातील 2008 च्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात अखेर मोठा निकाल लागला आहे. जवळपास 18 वर्षांनंतर ठाणे सत्र न्यायालयाने राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरती प्रक्रियेदरम्यान झालेल्या आंदोलनानंतर हे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्यावेळी उत्तर भारतीय उमेदवारांवर हल्ला, घोषणाबाजी आणि रेल्वे मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच चिथावणीखोर आणि भय निर्माण करणारे भाषण केल्याचाही आरोप राज ठाकरे यांच्यावर ठेवण्यात आला होता.
या प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सर्व आरोप राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच फेटाळून लावले होते. अखेर आज ठाणे न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.