
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र थांबता थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात रविवारी रात्र ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान तीन मोठे आणि अत्यंत भीषण अपघात घडले. सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाट, मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग घाट आणि अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर तीन अपघात झाले. या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तब्बल १७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ८०० फूट दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू
साताऱ्यातील महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात रविवारी रात्री एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एक स्कॉर्पिओ गाडी तब्बल ८०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत तब्बल ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच रविवारी रात्री १० वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. तसेच स्थानिक पोलीस व प्रशासनाच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. मात्र घाटातील अंधार आणि दरीची खोली यामुळे मदतकार्यात मोठे अडथळे येत होते.
मृतांची नावे
या अपघातग्रस्त व्यक्तींमध्ये सर्वजण साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मृतांमध्ये प्रामुख्याने तरुणांचा समावेश आहे.
- महेश अनिल पवार (२५)
- आदित्य अशोक साळुंखे (२१)
- रितेश राजेंद्र लोखंडे (२५)
- सुहास जितेंद्र लोखंडे (२०)
- अंश समीर चव्हाण (१८)
- उत्कर्ष आनंद शिंगटे ( २१)
- अनिल अभिमन्यू शिंगटे ( २५)
- नितीन किसन नायकोंडे ( ३५)
कोकण आणि दख्खनच्या पठाराला जोडणारा ४० किमी लांबीचा आंबेनळी घाट हा अत्यंत धोकादायक मानला जातो. साधारण ६२५ मीटर (२०५१ फूट) उंचीवर असलेल्या या घाटात अनेक घातक वळणे आहेत. या ठिकाणी थोडीही नजर चुकल्यास थेट दरीत जाण्याचा धोका असतो. नुकत्याच झालेल्या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुंबई-आग्रा महामार्गावर तिहेरी अपघात; 6 जणांचा मृत्यू
धुळे जवळील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग घाटात सोमवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या ठिकाणी एक रेतीचा डंपर आणि ट्रॅव्हल्स गाड्यांमध्ये जोरदार धडक होऊन भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातामध्ये 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पहाटेच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
एसटी बसने दुचाकीला चिरडले; चार जणांचा जागीच मृत्यू
अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील जुन्नर परिसरात तिसरा अपघात घडला. कल्याणकडून आळेफाट्याच्या दिशेने जात असताना एका एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, एसटी बसखाली चिरडल्या गेल्याने दुचाकीवरील चारही जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान राज्यात गेल्या काही तासांत झालेल्या या सलग अपघातांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तसेच घाट रस्ते आणि महामार्गांवर वाहन चालवताना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.