
विधान परिषद निवडणुकीच बिगुल वाजल्याने राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून आलं. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार असून या सर्व जागा स्थानाकि स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील आहेत. आजपासून म्हणजेच 25 मे ते 1 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत असून 2 जून रोजी अर्जांची छाननी होईल. पुढील महिन्याच्या 22 तारखेला, म्हणजेच 22 जून रोजी विधान परिषदेसाठी निवडणूक पार पडणार आहे. मात्र या निवडणुकीत सर्वाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीतील पक्षांमध्ये रस्सीखेच दिसून आली,तसेच अनेक चर्चा, रुसवेफुगवे हेही झाल्याची चर्चा होती.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून मोठी चर्चा आणि रस्सीखेच सुरू होती. विशेषतः सर्वाधिक जागा आपल्या वाट्याला याव्यात यासाठी घटक पक्षांमध्ये अनेक बैठका, चर्चांचे फेरे आणि नाराजीचे सूरही दिसले. अखेर दीर्घ चर्चेनंतर महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
आजपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून त्याच पार्श्वभूमीवर आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. विधान परिषेदसाठी अखेर महायुतीचा ठरलं असून कोणाला किती जागा मिळणार हेही फायनल झाल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीत भाजप 12 जागांवर निवडणूक लढवणार असून शिंदे गटाच्या शिवसेनेला 4 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा देण्यात येणार आहे.
अखेर महायुतीत ठरलं
17 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत खलबतं सुरू झाली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेकडून भाजपकडे 7 जागांची मागणी करण्यात आली आहे, तर भाजपने तीन ते चार जागा देण्याची तयारी दर्शवली होती. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी आम्ही कमी जागा घेऊन तडजोड केली, मात्र आता आम्ही सात जागांवर ठाम आहोत, अशी भूमिका या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेनं घेतल्याचे सूत्रांनी सांगितलं होतं. मात्र अखेर आता शिवसेनेच्या वाट्याला 4 च जागा आल्या आहेत असं समजतं.
शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी-हिंगोली या मतदारसंघातील मिळून 4 जागा जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही एक जागा मिळाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, भाजपने पुणे मतदारसंघावरील दावा कायम ठेवला आहे.
महायुतीतील या जागावाटपावर अखेर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज किंवा उद्या महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अंतिम निर्णय तिन्ही प्रमुख नेत्यांकडून घेतला जाणार असल्याचं समजतं.