
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने इतिहास घडवला आहे. आरसीबी आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील चॅम्पियन टीम ठरली आहे. आरसीबीने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होम टीम गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने मात करत आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. गुजरातने वॉशिंग्टन सुंदर याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीसमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 12 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. आरसीबीने 18 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 161 धावा केल्या आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. विराट कोहली आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरला. विराटने बॅटिंगने आरसीबीच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. विराटने नाबाद 75 धावांची खेळी केली. तर इतरांनीही बॅटिंग आणि बॉलिंगसह योगदान दिलं. तर गुजरातला पराभवामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे.
आरसीबीची बॅटिंग
इम्पॅक्ट प्लेअर वेंकटेश अय्यर आणि विराट या सलामी जोडीने आरसीबीला वेगवान सुरुवात करुन दिली. विराट-वेंकटेशने 4.3 ओव्हरमध्ये 62 धावा जोडल्या. गुजरातने त्यानंतर आरसीबीला सलग 2 ओव्हरमध्ये झटके दिले. वेंकटेशच्या रुपात आरसीबीने पहिली विकेट गमावली. वेंकटेशने 16 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. त्यानंतर देवदत्त पडीक्कल याने 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
राशीद खानची करामत
त्यानतंर राशीदने आरसीबीला नवव्या ओव्हरमध्ये 2 झटके दिले. राशीदने कॅप्टन रजत पाटीदार 11 आणि कृणाल पंड्या याला 1 रनवर आऊट केलं. मात्र त्यानंतर टीम डेव्हिड याने विराटला चांगली साथ दिली. विराट आणि टीमने पाचव्या विकेटसाठी 31 बॉलमध्ये 41 रन्स केल्या. टीमने 24 धावांचं योगदान दिलं. तर विराट आणि जितेश शर्मा या दोघांनी 29 धावांची भागीदारी करुन आरसीबीला विजयी केलं. जितेशने नॉट आऊट 11 रन्स केल्या. तर विराटने सर्वाधिक योगदान दिलं. विराटने 42 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 9 फोरसह नॉट आऊट 75 रन्स केल्या. तर गुजरातसाठी राशिद खान व्यतिरिक्त अर्शद खान, मोहम्मद सिराज आणि कगिसो रबाडा या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
पहिल्या डावात काय झालं?
गुजरात टॉस गमावून बॅटिंगसाठी आली. मात्र गुजरातसाठी वॉशिंग्टन सुंदर याचा अपवाद वगळता इतरांना काही खास करता आलं नाही. साई सुदर्शन आणि कॅप्टन शुबमन गिल या दोघांनी निराशा केली. आरसीबीच्या गोलंदाजांनी या दोघांना झटपट आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. गुजरातसाठी निशांत सिंधू याने 20 धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक आणि नाबाद 50 धावा केल्या. सुंदरच्या या खेळीमुळे गुजरातला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 155 रन्स करता आल्या. आरसीबीसाठी रसीख सलाम डार याने तिघांना आऊट केलं. जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी 1 विकेट मिळवली. तर कृणालने 1 विकेट मिळवून योगदान दिलं.
स्कोअरकार्ड
आरसीबी पंरपरा कायम राखण्यात यशस्वी
आरसीबीने गुजरात विरूद्धच्या अंतिम सामन्यातील विजयासह गेल्या 8 वर्षांपासूनची परंपरा कायम राखण्यात यश मिळवलं आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 2018 पासून क्वालिफायर 1 जिंकणारी टीमच चॅम्पियन राहिली आहे. आरसीबी यंदा ही परंपरा कायम राखण्यात यशस्वी ठरणार की नाही? याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र आरसीबीने ही परंपरा कायम राखलीय. आरसीबीने क्वालिफायर 1 सामन्यात गुजरातला पराभूत करुन फायनलमध्ये धडक दिली होती.
आरसीबी एकूण चौथी टीम
दरम्यान आरसीबीने या विजयासह एक खास कामगिरी करुन दाखवली आहे. आरसीबी आयपीएल स्पर्धेत 2 ट्रॉफी जिंकणारी चौथी टीम ठरली आहे. आरसीबीआधी चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या 3 संघांनी 2 वेळा ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. तसेच आरसीबी चेन्नई आणि मुंबईनंतर सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकणारी तिसरी टीम ठरली आहे.