
आरसीबीच्या जेतेपदाचं गुपित विराट कोहलीने केलं उघड, मुंबई इंडियन्सचा उल्लेख करत सांगितलं की…Image Credit source: IPL/BCCI
आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी कोण घालणार? याची उत्सुकता मागच्या दोन महिन्यांपासून होती. अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जेतेपद मिळवून या उत्सुकतेला पूर्णविराम दिला आहे. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. यासह मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनंतर सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घालणारा तिसरा संघ ठरला आहे. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमवून 155 धावा केल्या आणि विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 18 षटकात 5 गडी गमवून हे आव्हान गाठलं. पण स्पर्धेच्या सुरूवातीला आरसीबी संघ जेतेपदासाठी फेव्हरेट मानला जात नव्हता. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद जिंकेल अशी चर्चा होती. पण आरसीबीने या चर्चा फोल ठरवत सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. या जेतेपदाचं गुपित विराट कोहलीने सामन्यानंतर उघड केलं.
आयपीएल 2026 स्पर्धेचं जेतेपद मिळवल्यानंतर विराट कोहलीने सांगितलं की, ‘खरं सांगायचं तर, विश्रांतीनंतर आम्हाला दोन पराभव पत्करावे लागले. म्हणजे, एक पराभव आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध एक चुरशीचा विजय. मी म्हणेन की तो आठवडा आमच्यासाठी थोडा अवघड होता कारण आम्हाला अव्वल स्थानी राहायचे होते. पण MI विरुद्ध तो विजय मिळताच, आत्मविश्वास परत आला. मग केकेआरविरुद्ध आमचा एक मोठा विजय झाला आणि मग, हो, आम्ही गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचलो आणि अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करू लागलो..’ विराट कोहलीने अंतिम सामन्यात विजयी खेळी केली. त्याने 42 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या. त्याने या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले. विराट कोहली ऑरेंज कॅप काही मिळवू शकला नाही. पण या स्पर्धेत 600 हून अधिक धावा करत विक्रम रचला.
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू साखळी फेरीत दोनदा भिडले. 12 एप्रिलला झालेल्या सामन्यात आरसीबीने 240 धावांचं आव्हान दिलं होतं. हे काही मुंबई इंडियन्सला गाठता आलं नाही. हा सामना आरसीबीने 18 धावांची जिंकला. त्यानंतर 10 मे रोजी दुसऱ्यांदा या दोन संघात सामना झाला. या सामन्यात मुंबईचा संघ 166 धावांच करू शकला. हे आव्हान आरसीबीने शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं आणि आत्मविश्वास वाढला.