
आयर्यंड दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार? टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेपूर्वी दोन नावं चर्चेतImage Credit source: BCCI
भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. ही मालिका 26 जूनपासून सुरू होणार आहे. 26 जून आणि 28 जून असे दोन सामने होणार आहेत. या दौऱ्यासाठी भारताचा संघ 17 जूनपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. या मालिकेसाठी भारताचा नवा संघ पाठवण्याच विचार सुरू आहे. भविष्याचा वेध घेऊन त्या दृष्टीने पावलं उचलली जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता आहे. यासाठी संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांची नावं चर्चेत आहे. संजू सॅमसन टी20 वर्ल्डकपनंतर आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. आयपीएलच्या एका पर्वात दोन शतकं झळकवणारा संजू एकमेव खेळाडू ठरला आहे. तसेच त्याने राजस्थान रॉयल्सचं नेतृ्त्वही सांभाळलं आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे.
श्रेयस अय्यर देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. आयपीएल स्पर्धेत श्रेयस अय्यरने कर्णधार आणि फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वात केकेआरने 2024 मध्ये जेतेपद पटकावलं आहे. तर 2025 मध्ये पंजाब किंग्सला अंतिम फेरीत पोहोचवण्यात त्याला यश आलं होतं. यंदाही प्लेऑफच्या शर्यतीत संघ होता. पण थोडक्यासाठी चौथं स्थान हुकलं. श्रेयस अय्यर फॉर्मात आहे. पण श्रेयस अय्यर 2023 पासून एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्याकडे कर्णधारपद सोपण्यासाठी बीसीसीआयला विचार करावा लागेल.
कर्णधार सूर्यकुमार यादवच्या संघातील अडचणीत आलं आहे. खरं तर त्याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. पण आयपीएलच्या कामगिरीवर हा निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे सूर्यकुमार यादवला एक संधी दिली जाऊ शकते. पण त्याचं वाढतं वय पाहता 2028 टी20 वर्ल्डकपसाठी नवं नेतृत्व तयार करणं आवश्यक आहे. त्यामुळे टी20 संघातून वगळलं जाण्याची शक्यता आहे. एशियन्स गेम्सच्या संभाव्य 30 खेळाडूंच्या यादीतूनही सूर्यकुमारला वगळलं आहे.
दुसरीकडे, आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या युवा खेळाडूंना आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळू शकते. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकलेल्या पंधरा वर्षीय वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे.