
बीसीसीआय निवड समितीने 6 जून रोजी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. निवड समितीने यासह टीम इंडियाचा कॅप्टनही बदलला. बीसीसीआयने सूर्यकुमार यादव याला कर्णधारपदावरुन हटवलं. तर सूर्याच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यर याची टी 20I संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर इंग्लंड क्रिकेटमध्येही उलथापालथ पाहायला मिळाली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कसोटी संघाचा कर्णधार बदलला आहे. ईसीबीने (England Cricket Board) याबाबतची माहिती दिली आहे.
दोघांचा पत्ता कट
इंग्लंडचा नियमित कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस एटकीन्सन या दोघांना शिस्तभंग आणि प्रोटॉकॉलचं उल्लंघन करणं चांगलंच महागात पडलं आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. इसीबीने या मालिकेतील दुसर्या सामन्यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने दुसऱ्या सामन्यातून स्टोक्स आणि एटकीन्सन या दोघांना डच्चू दिला आहे. तर न्यूझीलंड विरुद्धच्या दुसर्या सामन्यासाठी जो रुट याला नेतृत्वाची सूत्र सोपावण्यात आली आहेत. दुसऱ्या कसोटी सामना 17 जूनपासून खेळवण्यात येणार आहे.
स्टोक्स आणि एटकीन्सन आऊट, नाईट क्लब प्रकरण नक्की काय?
इंग्लंडने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा 115 धावांनी धुव्वा उडवला. लॉर्ड्स कसोटीतील विजयानंतर स्टोक्स आणि एटकीन्सन या दोघांनी मिडनाईट कर्फ्यूचं उल्लंघन केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टोक्स आणि एटकीन्सन हे दोघे एका नाईट क्लबलमध्ये गेल होते. या नाईट क्लबमध्ये एका प्रकरणात इंग्लंड क्रिकेट टीमच्या सुरक्षा रक्षकासह मारहाणीचा प्रकार घडल्याचं समोर आलं. इसीबीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि चौकशीला सुरुवात केली. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत स्टोक्स आणि एटकीन्सन या दोघांना टीमपासून दूर रहावं लागणार आहे.
जो रुट याच्याकडे नेतृत्वाची धुरा
दरम्यान स्टोक्सला वगळल्याने जो रुट पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. रुटने 2017 ते 2022 दरम्यान इंग्लंडचं एकूण 64 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. रुटने त्याच्या नेतृत्वात इंग्लंडला 64 पैकी 27 सामन्यांमध्ये विजयी केलं. तर इंग्लंडला 26 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. तर रुटच्या नेतृत्वात इंग्लंड 11 सामने अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरली होती. त्यामुळे आता रुट त्याच्या नेतृत्वात इंग्लंड टीमला दुसऱ्या सामन्यात विजयी करुन मालिका जिंकून देण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.