
मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीलाही बसू लागला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा सुमारे 10 मिनिटे उशिराने धावत असून त्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे ते वाशिंद दरम्यान रेल्वे वाहतुकीत काही प्रमाणात विस्कळीतपणा निर्माण झाला आहे. तसेच ठाणे-पनवेल मार्गावरील लोकल सेवा जवळपास तासाभराच्या विलंबानंतर रवाना करण्यात आली. याशिवाय तुर्भे आणि कोपरखैरणे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे समोर आले आहे.
पहिल्याच पावसात रेल्वे सेवेवर परिणाम झाल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. सकाळची वेळ आणि कार्यालयीन गर्दीचा कालावधी असल्याने हजारो प्रवाशांना उशिराचा सामना करावा लागत आहे. मुंबई आणि परिसरातील मोठ्या प्रमाणातील नोकरदार वर्ग दैनंदिन प्रवासासाठी लोकल रेल्वेवर अवलंबून असल्याने या विलंबाचा थेट परिणाम त्यांच्या दिनचर्येवर होताना दिसत आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये रस्त्यांवरही पाणी साचले असून वाहनांच्या वेगावर परिणाम झाला आहे. परिणामी शहरातील विविध भागांमध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली असून नागरिकांना दुहेरी समस्येचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाने पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून, रेल्वे आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.