
राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू आहेत, नुकतीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्या मतदारसंघात खासदारांनी बंडखोरी केली, त्या -त्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडका सुरू आहे. दरम्यान ज्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला 4 आमदारांनी दांडी मारली होती, त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं.
दरम्यान त्यानंतरची मोठी बातमी म्हणजे महाविकास आघाडीने आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला 24 आमदार गैरहजर असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना आता मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीची मुंबईमध्ये जी बैठक झाली त्यानंतर ऑपरेशन आमदार याची चर्चा सुरू आहे. या बैठकीला 24 आमदार गैरहजर होते, या आमदारांच्या मनात नक्की काय आहे?हे विचारलं पाहिजे, महाविकास आघाडीच्या नेतृत्वावरती सगळे नाराज आहेत, स्वतःहून जर कोणी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत असतील तर त्याला आम्ही कशाला नाही म्हणू, 24 आमदार गैरहजर राहिले त्यांच्याशी आम्ही चर्चा करू त्यांची नाराजी काय आहे ते जाणून घेऊ असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान उदय सामंत यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. महाविकास आघाडीच्या खासदारांनंतर आता महाविकास आघाडीचे आमदार देखील फुटणार का? अस सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यावेळी बोलताना उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. किती दिवस फिरतात ते बघू ना, ते फक्त गद्दार गद्दार गद्दारच म्हणतात. ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत गद्दारी केली त्यांनी गद्दारीची भाषा करू नये, असं सामंत यांनी म्हटलं आहे.