
ठाकरे गटाचे फुटलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सुद्धा संजय राऊत यांनी अत्यंत बोचरी टीका केली. त्याचवेळी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट शब्दात हल्लाबोल केला. ओमराजे निंबाळकर देवेंद्र फडणवीस यांना भेटले असं पत्रकार म्हणाले. त्यावर राऊत म्हणाले की, “ओम निंबाळकरचा उल्लेख मी सोंगाड्या असा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्चर्य वाटतं मला विरोधी पक्षात असताने तुम्ही त्यांना भेट देत नाहीत, आणि पक्षांतर केल्यावर समोर बसवता, त्यांची कागदं मंजूर करता हा घटनाद्रोह आहे” “म्हणून कर्माची फळ मिळतायत, ऑपरेशन देवेंद्र सुरु झालं आहे. काही काळापूर्वी अशी चर्चा होती की, देवेंद्र दिल्लीत उच्चपदावर जाणार. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे” असं संजय राऊत म्हणाले. ओमराजे निंबाळकरांचा आज राऊतांनी ओम असा एकेरी उल्लेख करुन त्यांना सोंगाड्या म्हटलं.
“त्यांच्या याच वर्तणुकीमुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात पदावर राहतील की नाही अशा प्रकारचं रहस्यमयी वातावरणं मिंध्यांनी तयार केलय ही खूप गंभीर गोष्ट आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली. फुटीर खासदारांवर बोलताना राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. “त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्यांना अपात्र ठरवलं पाहिजे. शेड्युल 10 नुसार पक्षविरोधी कायद्यानुसार खासदारकी रद्द झाली पाहिजे. फडणवीस यांच्या चेंबरमध्ये बसून चहा, बिस्कीट खातात. फडणवीस त्यांच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करत असतील तर ते स्वत: घटनाद्रोही, रामद्रोही आहेत” असं राऊत म्हणाले. “ओम निंबाळकर हे राज्यातील जनतेचे गुन्हेगार आहेत. आधी त्यांना का निधी दिला नाही? कधीतरी याची किंमत चुकवावी लागेल” असा इशारा राऊत यांनी दिला.
हे टपोरी लोक
विधान परिषदेचं उपसभापतीद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार आहे, त्यासाठी काही नाव समोर येत आहेत, त्यावर राऊत यांनी जोरदार टीका केली. “नावं सुचवू द्या, हे टपोरी लोक आहेत. पक्षांतर, भ्रष्टांतर करणारे लोक आहेत. त्यांना पदावर बसवून त्यांची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न सुरु आहे. यांनी एकापक्षातून निवडून येऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केलाय. त्यांच्यावर खटले प्रलंबित आहेत” अशी टीका राऊत यांनी केली.