
मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारत दुर्घटनेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान ही इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या नातेवाईकांनी बचावकार्य आणि पोलिस प्रक्रिया संथ गतीने झाल्याचा आरोप केला आहे. वेळेवर मदत मिळाली असती तर आणखी जीव वाचले असते, अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर संतप्त नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी आयुक्तालय कार्यालयाला घेराव घातला.
दरम्यान, अक्षय सावंत यांचा मृतदेह मागील बाजूने रुग्णवाहिकेतून नेण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत नातेवाईकांनी तातडीने चौकशीची मागणी केली आहे. या घटनेमुळे मोशी परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.