
दिल्लीतील बहुचर्चित दारु घोटाळा धोरणाशी संबंधित प्रकरणात राउज एवेन्यू कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल तसचं माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता केली आहे. कोर्टाकडून दोन्ही नेत्यांना क्लीन चीट मिळाली आहे. हा अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा आहे. निकालानंतर मीडियाशी बोलताना अरविंद कजेरीवाल भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. कोर्टाने निकाल देताना स्पष्टपणे म्हटलं की, नुसता दावा करुन चालणार नाही. कोर्ट कुठल्याही आरोपांवर तेव्हाच विश्वास ठेवेल जेव्हा त्याच्यासोबत भक्कम, पर्याप्त पुरावा असेल. तपास यंत्रणेने दिलेले पुरावे कमजोर आणि अपर्याप्त आहे असं कोर्टाने म्हटलं.
राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त राहिलेल्या कुलदीप सिंह यांना सर्वात आधी कोर्टाने निर्दोष मुक्त केलं. त्यानंतर मनीष सिसोदिया यांना दिलासा दिला. मग, अरविंद केजरीवाल यांच्या निर्दोष सुटकेचे कोर्टाने आदेश दिले. दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक त्रुटी होत्या हे कोर्टाच्या टिप्पणीतून स्पष्ट झालं आहे. असे अनेक मुद्दे आहेत, ज्यावर समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही असं कोर्टाने म्हटलं. त्याचा आधारावर केजरीवाल आणि सिसोदिया यांना दिलासा मिळालाय.
तपास यंत्रणेचं म्हणणं आहे की, ते कोर्टाच्या निर्णयावर समाधानी नाहीत. याला हायकोर्टात आव्हान देणार. आदेशाचा विस्तृत अभ्यास केल्यानंतर वरच्या न्यायालयात अपील करु असं संकेत सीबीआय वकिलांनी दिले आहेत.
निकालावर अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
न्यायालयाच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल भावूक झाले होते. “माझ्याविरोधातील हे सर्व प्रकरण खोटं होतं. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी हे सर्व केलं होतं. आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यांनी मिळून स्वतंत्र भारतातील सर्वात मोठं कारस्थान रचलं” असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. “आमच्या पक्षाच्या पाच मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकलं. एका विद्यमान मुख्यमंत्र्याला घरात जाऊन अटक करुन तुरुंगात टाकलं, हे भारताच्या इतिहासात कधी झालं नव्हतं” असं अरविंद केजरीवाल म्हणाले.