
अनेक महिलांचे लैंगिक शोषण, त्यांच्यावर अत्याचार केल्याच आरोप असेला नाशिकचा कथित कॅप्टन, भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण राज्य हादरलं आहे. बुधवारी पोलिसांनी त्याला अटक केल्यावर तिथे मिळालेल्या पेन ड्राइव्हमध्ये खरातच्या काळ्या कृत्यांचे पुरावे व्हिडीओच्या स्वरूपात सापडले. अनेक राजकारणी, नेते मंडळी या बाबाच्या चरणी लीन व्हायची, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी तर त्याच्या डोक्यावर छत्री धरली पाय धुवून त्याची पूजाही केली. हे सगळे फोटो, व्हिडीओतून उघड झाल्यावर रुपाली चाकणकरांवर चहूकडून टीका झाली. विरोधी नेते तर होते, पण सत्ताधारी नेत्यांकडूनही त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला. याप्रकरणावरून दबाव वाढल्यावर अखेर काल रात्री रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांच्याकडे सोपवला.
मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतरही चाकणकरांवर होणारी टीका कायम असून आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहणी खडसे, शिवसेना उबाठा गटाच्या सुषमा अंधारे, तसेच राष्टरवादी काँग्रेस अजित पवार गटाच्याच रुपाली ठोंबरे यांनीही चाकणकरांवर निशाणा साधला. तर आता सामाजिक कार्यकरत्या अंजली दमानिया यांनीही चाकणकरांवर जोरदार टीका केली असून त्यांचा राजीनामा आधीच यायला हवा होता, रुपाली चाकणकरांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
राजीनामा देताना पोझ देऊन उभ्या, चेहऱ्यावर पश्चाताप नाही
यापुढे महिला आयोगच्या अध्यक्ष म्हणून आयपीएस ऑफीसर किंवा रिटायर्ड जज यांचीच नियुक्ती करा, म्हणजे महाराष्ट्राच्या महिलांना न्याय मिळेल, असं दमानिया म्हणाल्या. यावेळी त्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांबद्दलही बोलल्या. स्त्री म्हणून गेले 3 दिवस हा सगळा प्रकार घडताना त्या बघत होत्या, पण कोणतंही पाऊल उचललं नाही. महाराष्ट्रातील पहिली महिला उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी अनेक गोष्टी करणं अपेक्षित होतं, पण 3 दिवसांनी जेव्हा कळस गाठला, सगळ्यांनीच पत्रकार परिषदा घेतल्या, त्यानंतर त्यांनी तो राजीनामा स्वीकारला.
पण तो राजीनामा स्वीकारतानासुद्धा जे दिसलं ते म्हणजे सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता, पण रुपाला चाकणकर या तर जसं मॉडेलिंगसाठी उभं राहतात, तशी पोझ देतानाचा फोटो होता. आणि त्यानंतरचं त्यांचं बोलणं ऐकलं तर त्यात कुठेही खेद, विनम्रता नव्हती , एक अहंकार होता. हे सगळं पाहून वाटतं की चाकणकरांना खरंच इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे, अशा शब्दांच दमानिया यांनी रुपाली चाकणकरांवर टीकास्त्र सोडलं.