
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने (BMC Election) शिवसेना ठाकरे गटाकडून (Shivsena Uddhav Thackeray) पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. येत्या 27 ऑक्टोबर रोजी वरळी डोम येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा होणार आहे. स्वतः उद्धव ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. ‘निर्धार मेळावा संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा’ असा आशय असलेले पोस्टर जारी करण्यात आले आहे.
दिवाळी होताच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसून येतंय. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने या आधीच पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने देखील महापालिका जिंकण्यासाठी निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
Uddhav Thackeray Speech : उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार
मुंबईतील वरळी NSCI डोम मध्ये हा मेळावा पार पडणार आहे. त्यामध्ये ठाकरे गटाचे मुंबईतील पदाधिकारी, शाखाप्रमुख एकत्र येणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनीती काय असेल यासंबंधी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
Shivsena MNS Alliance : मनसेसोबत युतीची घोषणा होणार?
शिवसेना ठाकरे गटाकडून मनसेसोबत युती करण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या चार महिन्यांपासून रंगत आहे. या दरम्यान एकूण आठ ते नऊ वेळा दोन्ही ठाकरे बंधूंची काही ना काही निमित्ताने भेट होत आहे. दरम्यान, शिवसेना-मनसे युतीवर दोन्ही बंधूंमध्ये विस्तृत चर्चाही झाल्याची माहिती आहे. असं असलं तरी युतीची जाहीर घोषणा मात्र अद्याप झालेली नाही. त्यामुळे वरळीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे याची घोषणा करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Mahavikas Aghadi BMC : महाविकास आघाडीचे काय होणार?
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचे काय होणार हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मनसे सोबत आल्यास महाविकास आघाडीत त्यांना सामावून घेतलं जाणार का हे देखील अस्पष्ट आहे.
दरम्यान, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना सोबत घेण्यात नकार दिला आहे. महापालिकेची निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचा दावा त्यांनी केला.
Mahayuti Formula BMC : महायुतीचा फॉर्म्युला ठरला
एकीकडे महाविकास आघाडीचे काही ठरत नसले तरी महायुतीने मात्र त्यांचा फॉर्म्युला फिक्स केला आहे. मुंबई महापालिकेत महायुती म्हणून भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्रच लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तर मुंबई सोडून इतर ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती होतील. मात्र निवडणूक झाल्यावर तीनही पक्ष पुन्हा एकत्र येतील अशी रणनीती आखण्यात आली आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा