
Dadar Kabutar khana: मुंबईच्या दादर परिसरातील कबुतरखान्याबाहेर बुधवारी सकाळी जैन समाज प्रचंड आक्रमक होताना दिसला. मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ताडपत्री टाकून हा कबुतरखाना (Kabutar khana) बंद केला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत कबुतरखाने बंद न करता त्याठिकाणी पक्ष्यांना नियंत्रित स्वरुपात खाणे देण्यात यावे, असे निर्देश महापालिकेला दिले होते. तसेच दादर कबुरतखान्यावरील ताडपत्री काढण्याचे आदेशही दिले होते. मात्र, मुंबई महानगरपालिकेकडून ही ताडपत्री हटवण्यास उशीर झाल्याने बुधवारी जैन समाज प्रचंड आक्रमक झाला. जैन समाजाच्या आंदोलकांनी बुधवारी कबुतरखान्यावर चढून बांबू तोडून टाकले. जैन समाजाच्या काही महिलांनी सोबत आणलेल्या चाकू आणि सुऱ्यांनी ताडपत्री बांधण्यासाठी आणलेल्या सुतळी कापून काढल्या आणि ताडपत्री खेचून काढली. यावेळी कबुतरखान्याच्या परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. जैन आंदोलकांनी येथील वाहतूक रोखून धरली होती. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी प्रतिक्रिया करताना या प्रकाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
मंगलप्रभात लोढा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल यासंदर्भात बैठक झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कबुतरखान्यासंदर्भात निर्देश दिले होते. उद्या याप्रकरणाची हायकोर्टात सुनावणी आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आता जैन समाजाकडून जे सुरु आहे, ते नियमाला धरुन आहे का, हे नियमबाह्य आहे. आता मंगलप्रभात लोढा या सगळ्यावर बोलत का नाहीत? लोढा यांनी यावर खुलासा करावा. प्रशासनाने यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी, असे अविनाश अभ्यंकर यांनी म्हटले. धर्माच्या गोष्टी एका बाजूला, एका बाजूला विज्ञान आहे. या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल तातडीने हस्तक्षेप केला होता. मग गृहमंत्र्यांनी आश्वासन देऊनही जैन समाज इतका आक्रमक का झाला? त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर विश्वास नाही का, असा सवाल अभ्यंकर यांनी उपस्थित केला. या सगळ्या प्रकारानंतर आता मनसे आक्रमक होणार का, हे बघावे लागेल. मनसेने कबुतरखान्यांच्या विरोधात ठाम भूमिका घेतली होती. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे गंभीर रोग होतात. त्यामुळे कबुतरखाने हटवण्यात यावेत, या मागणीसाठी मनसे आग्रही होती.
आणखी वाचा
दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली, बांबू तोडले; जैन समाज आक्रमक, नेमकं काय घडलं?
आणखी वाचा