
परभणी : शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना मिळाले की नाही, यासाठी मराठवाड्याचा दौरा केला होता. त्यामध्ये, अतिवृष्टी नुकसानभरपाईचा आढावा घेत महायुती सरकारवर टीका केली. दगाबाज म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. आता, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मराठवाडा दौऱ्यावर असताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी बांधली? खरे दगाबाज कोण हे जनतेनं ओळखलं आहे, अशा शब्दात प्रत्युत्तर दिलंय. तसेच, मराठवाड्यात (Parbhani) नुसतेच येऊन गेले, एक बिस्किटचा पुडाही देऊन गेले नाहीत, असेही त्यांनी म्हटले. तर, फुकटचा ताठा अन् नाव उबाठा अशी खोचक टीकाही केली.
उद्धव ठाकरे यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्याचा दौरा करत सरकारवर दगाबाज असल्याचा आरोप केला, यांना वोटबंदी करा असेही आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर आज एकनाथ शिंदेंनी मराठवाड्यात जाऊन उद्धव ठाकरेंच्या या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला. परभणीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी नुसता फुकटचा ताठा अन् नाव उबाठा असे म्हणत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. मराठवाड्यात नुसतेच येऊन गेले, साधा बिस्किटचा पुडाही देऊन गेले नाहीत. माझ्या हातात काही नाही असं म्हणाले, पण जेंव्हा होते तेंव्हा तरी त्यांनी काही दिले का? असा प्रश्नही एकनाथ शिंदेंनी विचारला. अरे आम्हाला दगाबाज म्हणता खरी दगाबाजी कुणी केली? काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कुणी बांधली? हे जनतेने ओळखले आहे. म्हणूनच, जनता आमच्या पाठीशी असल्याचेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
परभणीत एकनाथ शिंदेंच्या चालकाने चुकवला रस्ता
परभणीत एकनाथ शिंदे यांच्या गाडीच्या चालकाने रस्ता चुकवल्याचा प्रकार घडला. येथील सभा संपल्यानंतर त्यांना परभणीच्या पोलीस हेडकॉटरकडे जायचे होते. मात्र, त्यांची एकच गाडी थेट उड्डाणपुलाकडे निघाली होती, चूक लक्षात येताच तात्काळ पुन्हा गाडी वळवण्यात आली आणि ते पोलीस हेडकॉटरकडे गेले. मात्र, काही क्षणाच्या ह्या प्रसंगामुळे सर्वच अचंबित झाले होते.
शिवसेना उबाठाचे जालना जिल्हाप्रमुख शिंदे गटात
जालना उबाठा जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला. तत्पूर्वी आंबेकर यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. “39 वर्ष एका संघटनेमध्ये राहून देखील दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना त्यांना परिषदेवर आणि राज्यसभेवर पाठवत असाल तर निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत आहे? असा सवाल भास्कर आंबेकर यांनी विचारला. प्रियंका चतुर्वेदी कुठे साध्या नगरसेवक सुद्धा झाल्या नव्हत्या, काँग्रेसमधून आल्या आणि 6 महिन्यात राज्यसभेवर गेल्या, अशी काय जादू आहे या लोकांकडे? असे उदाहरण त्यांनी दिले. तसेच, लोकांच्या प्रश्नावरती आम्ही काम करतो आणि वेगवेगळे गुन्हे दाखल करून घेतो, पण हे लोक आयते येतात आणि मोठे कसे होतात? कार्यकर्त्यांशी संबंध नसणे हा उद्धव ठाकरे यांचा वीट पॉईंट आहे, असेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा
ह्रदयद्रावक… नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
आणखी वाचा