
Sanjay Raut : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे कार्यकर्ते विधिमंडळाच्या लॉबीत आमने सामने आले. यावेळी गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेने जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण केली आहे. या संपूर्ण प्रकारावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज्य सरकारसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र राज्याची संस्कृती उध्वस्त झाली असल्याचे राऊत म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत?
महाराष्ट्राच्या विधानभवनात आज गँग वॉर झाले. भारतीय जनता पक्षाने विधीमंडळात आणि त्यांच्या पक्षात गुंड टोळ्या आणल्या आहेत असे संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र राज्याची संस्कृती उध्वस्त झाली आहे.फडणवीस हे गृहमंत्री आहेत, त्यांच्या नाकासमोर विधानभवनात दंगल झाल्याचे संजय राऊत म्हणाले. आज ज्याने विधानभवनात दंगल केली ते आमदार पडळकर टीम देवेंद्रचे सदस्य आहेत. मोदी शाह यांनी महाराष्ट्रात हे काय पेरले आहे? अत्यंत वेदनादायी असे हे चित्र आहे. खरंच कुठे नेऊन ठेवलाय शिवरायांचा महाराष्ट्र? असा सवाल करत राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. विधानभवनाच्या लॉबीतच दोघांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली आहे. गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले याने ही मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. काल देखील जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये वाद झालेला होता. कालचा वाद हा शिवागाळ करण्यापर्यंत होता. मात्र, आज .विधानभवनाच्या लॉबीतच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं. यामुळं विधानभवन परिसरात काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, या विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या मारहाणीचा मुद्दा विधानसभेत देखील गाजला. अनेक आमदारांनी चिंता व्यक्त केली आहे. विधानभवनात येताना अडचणी येत असल्याचे आमदार सना मलिक यांनी आरोप केला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागितला अहवाल
दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अहवाल मागितला आहे. याबाबत बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, मी अहवाल मागितला आहे, अहवाल प्राप्त झाल्यानंतर उचित कारवाई करेल असे नार्वेकर म्हणाले. विधीमंडळातील सदस्यांची सुरक्षेची जबाबदारी माझी आहे. त्यासंदर्भात उचीत कारवाई मी करेन असे नार्वेकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी, विधानभवनाच्या लॉबीतच राडा
आणखी वाचा