
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने राज्याच्या राजकारणात तीव्र वाद निर्माण झाला होता. सपकाळ यांनी टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे, असे वक्तव्य केल्याने भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. या विधानावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही सपकाळ यांनी ट्विट करत टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच त्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला, असा दावा केला होता. दरम्यान, या तुलनेनंतर भाजप आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून सपकाळ यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. विरोधकांनी टिपू सुलतान यांनी हजारो हिंदूंवर अत्याचार केले आणि मंदिरे लुटली, असे आरोप करत काँग्रेसने सपकाळ यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी देखील केली होती.
वाद तीव्र झाल्यानंतर सपकाळ यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. “शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “माझ्या शब्दांचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला,” असेही ते म्हणाले.