
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या मतदानाचे निकाल आज ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झाले आहेत. कोकणात पुन्हा एकदा महायुतीचा झंझावात पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गात भाजपने, तर रत्नागिरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विरोधकांचे सर्व किल्ले भुईसपाट केले आहेत. विशेषतः मंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत विजयाचा नवा विक्रम गाठत भाजपची एकहाती सत्ता आणली आहे.
वैभववाडीत नितेश राणेंचा करिश्मा, विरोधकांचा सुफडासाफ
वैभववाडी पंचायत समितीच्या ६ पैकी ६ जागा जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. जिल्हा परिषदेच्या तिन्ही जागांवरही भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे राणे समर्थकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जल्लोष सुरू केला आहे.
पंचायत समिती विजयी उमेदवार
- भुईबावडा: देवानंद पालांडे (भाजप)
- कोळपे: सुवर्णा संसारे (भाजप)
- खांबाळे: मंगेश लोके (भाजप)
- लोरे: सिध्देश रावराणे (भाजप)
- उंबर्डे: साची कोलते (भाजप)
- कोकिसरे: साधना नकाशे (भाजप – बिनविरोध)
जिल्हा परिषद निकाल (वैभववाडी)
- कोकिसरे: श्रावणी रावराणे (विजयी)
- लोरे: रिध्दी सुतार (विजयी)
- कोळपे: प्रमोद रावराणे (बिनविरोध)
रत्नागिरीत शिंदेचा विजय
रत्नागिरी पंचायत समितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकतर्फी विजय मिळवला आहे. एकूण २० जागांपैकी तब्बल १७ जागांवर शिवसेनेने बाजी मारली आहे. तर भाजपला केवळ २ जागा मिळाल्या आहेत.
- भांबेड जिल्हा परिषद गट: विनिता गांगण (शिवसेना – शिंदे) विजयी.
- भांबेड पंचायत समिती गण: उमेश पत्की (शिवसेना) आणि शैलेश खामकर (भाजप) विजयी.
सिंधुदुर्गातील इतर महत्त्वाचे निकाल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक निकालांनी अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल पाहायला मिळत आहेत. विशेषतः वेंगुर्ला तालुक्यातील आडेली पंचायत समिती गणात अपक्ष उमेदवार नितीन मांजरेकर यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धूळ चारत विजय मिळवला आहे. याच तालुक्यात परुळे आणि म्हापण या पंचायत समिती गटांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपली पकड मजबूत केली आहे. या ठिकाणी अनुक्रमे सचिन देसाई आणि यज्ञा साळगावकर यांनी दणदणीत विजय मिळवून पक्षाचा झेंडा फडकवला आहे.
तर दुसरीकडे, सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गणात भाजपला मोठ्या बंडाळीचा फटका बसला आहे. येथे भाजपच्याच बंडखोर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. त्यामुळे मोठा राजकीय धक्का बसला असून, अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. या संमिश्र निकालांमुळे जिल्ह्यातील स्थानिक सत्तासमीकरणे अधिक रंजक बनली आहेत.