
राज्यातील गॅस टंचाईचा परिणाम आता खाद्य व्यवसायावरही दिसून येत आहे. मुंबईतील चर्चगेट परिसरातील खाऊगल्लीत अनेक स्टॉल बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. काही ठिकाणी गॅस उपलब्ध नसल्यामुळे कोळशाच्या शेगडीचा वापर करून व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर काही विक्रेत्यांनी स्टॉल उशिरा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात वडापावच्या दरात वाढ झाली असून एका वडापावची किंमत 25 रुपये करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे 5 रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्यांना परवडणारा वडापाव महागल्याने ग्राहकांमध्ये असंतोष दिसून येत आहे.
पुण्यातील प्रसिद्ध गार्डनर वडापावचे दुकानही गॅस टंचाईमुळे बंद ठेवण्यात आले असून दुकानाबाहेर त्याबाबतची सूचना लावण्यात आली आहे. नाशिकमध्ये काही नाश्ता सेंटर बंद आहेत, तर अनेक ठिकाणी फळांचे स्टॉल सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, डोंबिवलीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे काही हॉटेल्स बंद ठेवावी लागली आहेत. या परिस्थितीमुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याची माहिती समोर येत आहे.