
मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेतर्फे ‘ग्रंथोत्सव २०२६’ला उत्साहात सुरुवात करण्यात आली. मुंबईतील रुईया कॉलेजच्या बाहेर हा भव्य पुस्तक प्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवाचे आयोजन ॲडव्होकेट वैभव करंदीकर यांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध विषयांवरील शेकडो पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ‘वाचाल तर वाचाल’ या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, वाचकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना वैभव करंदीकर यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाचन ही आपली संस्कृती असून समाज घडवण्यासाठी पुस्तके अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात, असे ते म्हणाले. जो समाज वाचन करतो आणि पुस्तकांची देवाणघेवाण वाढवतो तो समाज अधिक सुसंस्कृत बनतो, असे त्यांनी नमूद केले. विकसित भारत घडवायचा असेल तर वाचनाची सवय लागणे आवश्यक आहे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. ग्रंथप्रेमींसाठी हा ग्रंथोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.