
Mumbai Rain: राज्यासह मुंबई आणि मुंबई उपनगरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार कमबॅक केलं आहे. अशातच मुंबई आणि लगतच्या परिसरात जोरदार पावसाच्या सारी कोसळत आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी आज (16 ऑगस्ट) ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. सोबतच नागरिकांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने मुंबईकरांना केलं आहे.
दरम्यान, मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेमार्गावरील विद्याविहार आणि कुर्ला या स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे रुळ पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याचीही शक्यता आहे. याशिवाय, दादर परिसरातही रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्याविहार ते सायन दरम्यान रुळांवर पावसाचे पाणी साचले होते, आता पाऊस कमी झाल्याने पाण्याचा निचरा होऊ लागला आहे, तरीही लोकलची वाहतूक अजून 20 ते 25 मिनिटांनी उशिराने सुरु आहे. तर ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावरील वाहतूक देखील 20 मिनिटे उशिराने सुरू आहे, दुसरीकडे, कल्याण रेल्वे सेवा सुरळीत असल्याची माहिती समोर आली आहे. यातील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु असल्याची माहिती कल्याण स्टेशनच्या रेल्व अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला आज अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त, उपायुक्त, सर्व प्रशासकीय विभागाचे (वॉर्ड) सहायक आयुक्त, तसेच संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयात तत्काळ हजर राहून समन्वय साधावा. तसेच, गरजेनुसार योग्य त्या आपत्कालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले आहेत.
मुंबईमध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झालं आहे. याचा फटका आता नागरिकांना बसत आहे. सखल भागासह रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तर चुनाभट्टीकडून सायनच्या दिशेने जाणारी वाहतूक ही खोळंबली आहे. यामध्ये ॲम्बुलन्स देखील अडकून फसली असून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे.
दरम्यान मुंबई उपनगरातील विक्रोळी परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर उर्वरित लोक जखमी झाले असून या जखमींना उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंधेरीत देखील दमदार पाऊस झाल्याने अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याची माहिती आहे. त्यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर त्याचा परिणामी रेल्व आणि वाहतुकीवर देखील होऊ शकतो.
Published at : 16 Aug 2025 09:23 AM (IST)
बातम्या फोटो गॅलरी
आणखी पाहा