
Mumbai Weather Update: मुंबईसह कोकणकिनारपट्टीवर पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे राहणार आहेत. मुंबई शहरात पुढील 3 ते 4 तासांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी 6:20 वाजता भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने ‘Nowcast Warning’ जारी केली असून, मुंबई शहरातील काही भागांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, पुढील दाेन दिवस अरबी समुद्रात उंचच उंच लाटा उसळणार असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
मुंबई शहरात सोमवारपासूनच हलक्या सरींचं आगमन सुरू असून, सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत रस्त्यांवर पाणी साचण्याची परिस्थिती उद्भवू शकते. कार्यालय सुटण्याच्या वेळेस नागरिकांची वर्दळ वाढलेली असते, त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबईसह कोकण किनारपट्टीला अलर्ट
केवळ मुंबई शहरातच नव्हे तर कोकण किनारपट्टीसाठीही एक महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीस 23 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5:30 पासून ते 24 जुलै 2025 रात्री 8:30 वाजेपर्यंत 3.6 ते 4.3 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. याचबरोबर पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या किनारपट्टीसाठीही 24 जुलै रोजी रात्री 8:30 पर्यंत 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटा उसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी किंवा अन्य कारणासाठी जाणाऱ्या लहान बोटी, होड्या यांना किनाऱ्यावर थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने यासंदर्भात माहिती दिली आहे.
सागरी सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, स्थानिक यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी अनावश्यकपणे समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, तसेच हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
पुढील चार दिवस कसे राहणार हवामान?
राज्यात पुढील चार दिवस मुंबई उपनगरासह संपूर्ण कोकणपट्टी तसेच घाट माथ्यावर पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत. संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाची उघडीप राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद होईल असे हवामान विभागाने सांगितले आहे .
हेही वाचा
आणखी वाचा