
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चा रंगली आहे. बजेट अधिवेशनावेळी त्यांनी “महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार” असे सूचक विधान केले होते. आता बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या वक्तव्यावर पुन्हा भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुतीमधील “भूकंप” हा अशोक खरात प्रकरणातून सुरू झाला आहे. “अशोक खरात हे फक्त निमित्त आहे. भाजप आणि महायुतीत अंतर्गत संघर्ष सुरू असून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचीच सुरुवात आता महाराष्ट्रात झाली आहे,” असे त्यांनी सांगितले. पटोले यांनी पुढे म्हटले की, अशोक खरात प्रकरण आजचे नसून गेल्या सात-आठ वर्षांपासून सुरू आहे. “जेव्हा हे सत्तेत होते, तेव्हा त्यांना सर्व माहिती होती. तेव्हा हे प्रकरण थांबवता आले असते, महिलांचे शोषण रोखता आले असते. मात्र, हे प्रकरण राजकीय फायद्यासाठी वापरले गेले,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच, सत्ताधारी सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटले की, “भोंदू बाबांच्या माध्यमातून हिंदू धर्माला बदनाम करण्याचे काम झाले आहे, त्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.” अशोक खरात प्रकरणात ईडी आणि राज्य सरकारची एसआयटी तपास करत असल्याचा उल्लेख करत, अनेक नेत्यांचे पैसे परदेशात पाठवण्याचे काम झाल्याचेही त्यांनी सूचित केले. या सर्व घडामोडींमुळे महायुती सरकारमध्ये मोठे राजकीय परिणाम दिसून येतील आणि “भूकंप” होण्याची शक्यता असल्याचा पुनरुच्चार नाना पटोले यांनी केला.