
मंत्रालयात अन्न व औषधी प्रशासन विभागातील आलोसे राजेंद्र ढेरंगे या क्लार्कला मेडीकल परवाना निलंबन रद्द करण्यासाठी 35000 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. लाचलुचपत विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. ढेरंगेने 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ज्या विभागात लाच मागण्याचा प्रकार झाला, तो खातं मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे आहे. या प्रकारावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. “काल जो काय प्रकार झाला तो अतिशय चुकीचा आहे. असं व्हायला नको होतं. ते ढेरंगे पकडले गेले ते क्लार्क म्हणून काम करतात. सुनावणी पेपर वेगैरे बनवण्याचं काम करतात. ते तसे बाहेरुन म्हणजे तसे ते मूळचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आहेत. त्यांना उसनवारीवर घेतलय. त्याच्याकडून हा प्रकार झाला. त्यांना कुठेही पाठिशी घालणार नाही. शासकीय, कायदेशीर जी बाब असेल त्याचा त्यांना जाब द्याव लागेल” असं नरहरी झिरवाळ म्हणाले.
“या प्रकाराचा पीएस, मंत्र्याचे ओसडी यांच्याशी काही संबंध नाही. माझी जबाबदारी आहे, नाही म्हणूनच चालणार नाही. त्याने जे प्रकार केलेत, त्याला पाठिशी घालणार नाही हे खात्रीने सांगतो. पूर्वीचे त्याचे काय गुण होते, हे सांगता येणार नाही” असं नरहरी झिरवाळ म्हणाले. “मुख्यमंत्री महोदयानी पीएस, ओसडी असा मंत्रालयीन स्टाफ खूप बारकाव्याने दिला आहे. ढेरंगेची तक्रार याआधी कधी आली नव्हती. त्याला जाब द्यावाचं लागेल. 50 हजार रुपये लाच हा प्रकार व्हायलाच नको. क्लार्क असला, तरी त्याची एवढी मोठी सरकारी पोस्ट आहे” असं नरहरी झिरवाळ म्हणाले.
माझा स्वाभाव सगळ्यांना माहित आहे
विरोधकांकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी होतेय, यावर झिरवाळ म्हणाले की, “त्याची लिंक माझ्यापर्यंत आली, तर राजीनामा देणं माझी जबाबदारी राहिलं” “माझ्याशी लिंक जोडली गेली, तर मी राजीनामा देईन. ज्याने केलं, त्याला सजा भोगावी लागेल. माझ्यापर्यंत जबाबदारी आली, तर मी राजीनामा देईन. नैतिकता माझ्यामध्ये आहे” असं नरहरी झिरवाळ बोलले. “मला टार्गेट वैगेर कोणी करत नाहीय. माझा स्वाभाव सगळ्यांना माहित आहे. मी असं काही चुकीच करणार नाही” असं नरहरी झिरवाळ म्हणाले.