
राजस्थानकडून दारूण पराभव झाल्यानंतर कर्णधार ऋतुराजने असं सांगितलं कारणImage Credit source: CSK TWITTER
आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात खूपच निराशाजनक झाली. पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सने दारूण पराभव केला. नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी करावी लागली. खरं तर या सामन्यात 200 पार धावांची गरज होती. पण चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांचं काही एक चाललं नाही. एकापाठोपाठ एक धडाधड विकेट पडत गेल्या. दहाव्या विकेटसाठी ओव्हरटन आणि अंशुल कंबोजने 33 धावांची भागीदारी केली म्हणून 127 धावा करू शकले. या धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीचं वादळ घोंघावलं. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने 12.1 षटकात 2 गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं. या विजयामुळे राजस्थान रॉयल्सला नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. राजस्थान रॉयल्सला 2 गुण मिळाले. इतकंच काय तर +4.171 नेट रनरेट झाला आहे. या पराभवाचं चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विश्लेषण केलं.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ‘सुरुवातीला खेळपट्टी खूपच कठीण होती. फिरकी गोलंदाजांनाही थोडी मदत मिळत होती. तुम्हाला फक्त खेळत राहायचं असतं. खेळपट्टी थोडी कठीण होती. तुम्ही ते विसरून पुढे जायचं, तीन दिवसांनी आमचा दुसरा सामना आहे. संघात बरेच तरुण खेळाडू आहेत. मी अंतिम विजयावर ठाम विश्वास ठेवणारा नाही. महत्त्वाच्या खेळाडूच्या बाबतीत, सरासरी धावसंख्या किती असावी हे निश्चित नसतं. फलंदाजांसाठी फक्त आपल्या खेळावर विश्वास ठेवण्यावर भर होता. आज ते जमलं नाही. आम्ही फलंदाजीमध्ये अधिक चांगली कामगिरी करू शकतो.’
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग म्हणाला की, नाणेफेकीत मी नशीबवान ठरलो. आम्हाला माहित होतं की दमटपणाचा परिणाम होणार आहे. प्रत्येकाने आपापल्या योजनांची अंमलबजावणी केली. यासाठी खूप तयारी झाली आहे. यावर्षी ट्रॉफी जिंकणे हे आमचे ध्येय आहे. आम्हाला एक असा संघ बनायचे आहे जो स्मार्ट क्रिकेट खेळेल. ब्रिजेशने जे केले ते अविश्वसनीय होते. मी वैभवला सांगतो की तो 14 सामने खेळणार आहे. आणि तो जाऊन असे काहीतरी करतो. तो माझ्या संघात असल्याचा मला खूप आनंद आहे.