
Sanjay Raut: ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ आणि विरोधकांना एकहाती शिंगावर घेणारे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून सक्तीची विश्रांती घेत आहेत. त्यांना गंभीर आजार झाल्यामुळे डॉक्टरांनी सार्वजनिक जीवनापासून काही दिवस दूर राहण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला प्रमाण मानून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 31 ऑक्टोबरला एक जाहीर पत्र लिहून पुढील दोन महिने मी सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु झाले होते. काही दिवसांपूर्वीच ते रुग्णालयातून घरी आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरातून बाहेर पडले नव्हते. मात्र, सोमवारी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीदिनी संजय राऊत कोणतीही तमा न बाळगता घराबाहेर पडले आणि दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले.
संजय राऊत यांनी 31 ऑक्टोबरपासून घराबाहेर पडणे पूर्णपणे बंद केले होते. मात्र, आज बाळासाहेब ठाकरे यांचा 13 वा स्मृतीदिन असल्याने त्यांना राहावले नाही आणि ते बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घ्यायला घराबाहेर पडले. शर्ट-पँट अशा पेहरावात ते शिवाजी पार्कवर दाखल झाले. यावेळी संजय राऊत यांच्या तोंडाला संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावलेला होता. शिवाजी पार्कच्या परिसरात गाडीतून उतरल्यानंतर संजय राऊत हे त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा हात पकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत चालत गेले आणि लाडक्या साहेबांचे दर्शन घेतले.
राज्यात 2019 सालच्या सत्तानाट्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसल्यापासून संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा अविभाज्य भाग राहिले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना फुटल्यानंतर बहुतांश आमदार, खासदार आणि बडे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ताधारी गटात दाखल झाले होते. मात्र, संजय राऊत यांनी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. ते दररोज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाची बाजू जोरकसपणे मांडत होते. मात्र, ऐन मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. त्यामुळे संजय राऊत यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली आहे.
Sanjay Raut: संजय राऊत यांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलं होतं?
सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यासाठी नम्र विनंती
जय महाराष्ट्र !
आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.
कळावे.
आणखी वाचा
आणखी वाचा