
टीव्ही 9 च्या सत्ता सम्मेलन या विशेष कार्यक्रमात टीम इंडियाचे खेळाडू सहभागी झाले. आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि ऑलराउंडर तसेच टीम इंडियाचा उपकर्णधार अक्षर पटेल या दोघांनी टीव्ही 9 च्या या कार्यक्रमात आपल्या इथवरच्या प्रवासाबाबत भाष्य केलं. अक्षरने या कार्यक्रमात तो क्रिकेटर कसा झाला याबाबत सांगितलं. अक्षरला कधीच क्रिकेटपटू व्हायचं नव्हतं. मात्र अक्षर आज कुणामुळे क्रिकेटर झालाय हे त्याने उलगडलं. तसेच अक्षरने त्याच्या नावाच्या स्पेलिंगबाबतही किस्सा सांगितला.
आजीचा मृ्त्यू आणि वडिलांच्या अश्रुंमुळे टीम इंडियापर्यंत पोहचण्याची प्रेरणा मिळाल्याचं अक्षरने सांगितलं. तसेच Akshar चं Axar हा नावातील बदल कुणामुळे झाला? त्यामागील नेमका किस्सा काय होता? हे देखील ऑलराउंडरने सांगितलं.
ऑलराउंडर अक्षर पटेल काय म्हणाला?
“टीम इंडियासाठी कधी खेळेन असा विचार केला नव्हता. मला फक्त क्रिकेट खेळायला आवडायचं. मी खेळायला जायचो तेव्हा आजी विचार करायची की मी टीव्हीवर दिसेन. ती (आजी) मला निळ्या जर्सीत पाहायची. मी टीव्हीवर दिसेन असं कायमच आजीला वाटायचं, तेव्हा मी जिल्ह्याच्या संघासाठी खेळत होतो. मात्र एके दिवशी माझी आजी कायमची सोडून गेली. मात्र मला आजी गेल्याचं कुणीच सांगितलं नाही. मला 3 दिवसांनंतर माझ्या मित्रांनी आजी गेल्याचं सांगितलं”, असंही अक्षर पटेल म्हणाला.
“मी त्यानंतर घरी पोहचलो. वडील फार रडले. तुझ्या आजीला तुला टीम इंडियासाठी खेळताना पाहायचं होतं. त्यानंतर मला जाणवलं की आपण टीम इंडियासाठी खेळायला हवं. तेव्हाच मी टीम इंडियासाठी खेळायचा दृढनिश्चय केला. त्यानंतर मला 2014 साली टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळाली”, असं अक्षरने या कार्यक्रमात सांगितलं.
दिलखुलास अक्षर पटेल
अक्षरच्या नावाची स्पेलिंग Akshar अशी आहे. मात्र शाळेतील मुख्याध्यापकांच्या चुकीमुळे त्याचं नावं Axar असं झालं. “माझी अंडर 19 टीममध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली होती. मात्र तेव्हा माझ्याकडे पासपोर्ट नव्हता. त्यामुळे मी वडिलांना तातडीने पासपोर्टसाठी अर्ज करायला सांगितला. मुख्याध्यापकांनी सर्टिफिकेटवर axar असं लिहिलं. पासपोर्ट पण मिळालं आणि दुसऱ्याच वर्षी टीम इंडियासाठी खेळलो”, असं अक्षरने सांगितलं.