
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना गती मिळाली आहे. विविध पक्षांमध्ये बैठका आणि चर्चा सुरू असताना, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती समोर आली. बारामतीत निवडणुकीस पाठिंबा मिळवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यावर प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले की, सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही, हे आधीच घोषित केले असल्याबद्दल सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे त्यांनी आभार मानले. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याने तेही उमेदवार देणार नाहीत, असे तटकरे यांनी सांगितले. याशिवाय, काँग्रेसशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु असून, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी आज बोलणे होईल आणि त्यांना देखील निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली जाणार आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. बारामती पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील असल्याने या प्रकरणाकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे.