
राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणूक, पार्थ पवारांनी काँग्रेसबद्दल केलेलं वक्तव्य यावर बोलल्या आहेत. “मी महाविकास आघाडीचे आभार मानते. विरोधी पक्षात भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून चर्चा केली. प्रत्येकाने एकमेकावर विश्वास दाखवला. आदरणीय पवार साहेब बिनविरोध निवडून आले ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा हा वारसा आहे. विरोधी पक्ष आपला शत्रू नसतो. मतभेद असले पाहिजेत मनभेद असू नयेत. राज्यसभा निवडणुकीवेळी सर्वच पक्षांनी समंजसपणा दाखवला. सन्मानाने एकमेकाशी बोलून निवडणूक बिनविरोध झाली. या इलेक्शनमध्ये काँग्रेसची भूमिका लोकशाही पद्धतीची आहे. त्यात गैर वाटत नाही” असं सुप्रिया सुळे बोलल्या.
काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु आहे म्हणून त्यांनी उमेदवार दिला. किंमत चुकवावी लागेल या पार्थ पवारांच्या स्टेटमेंटवर पत्रकारांनी विचारलं. त्यावर सुप्रिया सुळे बोलल्या की, “एकतर काँग्रेस पक्ष हा एक भारतातला मोठा पक्ष आहे. कुठलाही राजकीय पक्ष हा जर संविधानाच्या चौकटीत काम करत असेल. आपण लोकशाहीवर प्रेम करणारे लोक आहोत” “तुमच्या जन्माआधीची गोष्ट सांगते, आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्ष जवळून पाहिला आहे. काँग्रेसच्या मताने निवडून आलो. दादा असतील, पवारसाहेब आम्ही काँग्रेसच्या विचाराच्या तालमीत लहानाचे मोठे झालो. या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. आज आपण मोकळा श्वास घेतोय. यामागे काँग्रेस आहे. हे कोणी विसरु शकत नाही” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
लोकशाहीत बोलण्याचा अधिकार सर्वांनाच
“काँग्रेसचं योगदान मोठं आहे. मनमोहन सिंह, नरसिंह राव यांनी मोठे आर्थिक धोरण बदलाचे निर्णय केले. चले जावचा नारा याच काँग्रेस पक्षाने दिला. काँग्रेस पक्षाचं योगदान नाकारुन चालणार नाही. पण लोकशाहीत बोलण्याचा अधिकार सर्वांनाच आहे” असही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पार्थ पवार चुकले नाहीत का?
पार्थ पवार चुकले नाहीत का? त्यांच्या परिपक्वतेबद्दलच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मला असं वाटतं की हे मला विचारण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. ते त्यांच्या खासदाराचं, त्यांच्या पक्षाचं मत आहे. तुम्ही अजित पवार गटाला विचारलं पाहिजे तुमचा स्टँड काय?”