
लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाहतूक सुरक्षिततेच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित करत अपघातांच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली. झिरो अवरमध्ये बोलताना त्यांनी देशातील वाढत्या प्रवास आणि वाहतूक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली. सुळे म्हणाल्या की, रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडूनही सातत्याने रोड सेफ्टीबाबत जागरूकता करण्याचे आवाहन केले जाते, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, त्यांनी भावनिक होत वैयक्तिक अनुभवही मांडला. “28 जानेवारीला माझ्या भावाचा विमान अपघात झाला. आज त्याला दोन महिने पूर्ण झाले, मात्र अजून न्याय मिळालेला नाही,” असे सांगत त्यांनी दुःख व्यक्त केले. “जर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यालाच न्याय मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांना न्याय कसा मिळेल?” असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी, अजित पवार यांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी, म्हणून भारत सरकारला विनंती केली आहे.