
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या (Mumbai) लाइफ लाईनला अडवण्याचे प्रयत्न रेल्वेच्याच (Railway) कर्मचाऱ्यांनी करावे अशी घटना कधी घडली नव्हती. मात्र, 6 नोव्हेंबर रोजी अशीच घटना घडली, या घटनेमुळे झालेल्या गर्दीचा फटका बसून 2 प्रवाशांना लोकलच्या धडकेत जीव गमवावा लागला. याशिवाय, चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागल्याचं दिसून आलं. आता या संदर्भात व्हिडिओ आणि सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. एबीपी माझाने व्हिडिओ (Video) द्वारे थेट पुरावाच सर्वांसमोर आणल्याने कर्मचारी संघटनांच्या कृतींची निवृत न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.
6 नोव्हेंबर, आठवड्याचा चालू दिवस, रोजच्या प्रमाणेच सकाळी धावत पळत लोकलने कामावर आलेले मुंबईकर संध्याकाळी पुन्हा आपल्या घरच्या दिशेने जायला निघाले. सीएसएमटी स्टेशनवर आल्यावर लोकल उभ्या दिसताच त्यामध्ये चढले. पण लोकल जागची हलायचे नाव नाही, पंधरा मिनिटे, अर्धा तास… पाऊण तास लोकल बंदच. सीएसएमटी सारखे स्थानक जिथे संध्याकाळी मुंगीलाही पाय ठेवण्यास जागा नसते त्याठिकाणी तब्बल एक तास लोकल बंद ठेवल्यावर काय गर्दी झाली असेल याचा विचार देखील करवत नाही… याचे कारण? रेल्वे कर्मचारी यूनियन हे होते.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघ या महत्वाच्या रेल्वे कर्मचारी युनियनने त्यादिवशी सीएसएमटी स्थानकाट निदर्शने केली. यांच्यासह काही लहान मोठ्या संघटनाही होत्या. जीआरपी वर दबाव टाकण्यासाठी ही आंदोलने करण्यात आली आणि रेल्वे कर्मचारी संघटनेची ही जुनीच स्ट्रॅटेजी आहे. मात्र, यावेळी मोटरमन यांना लोकलपर्यंत जाऊच देण्यात आले नाही. सीएसएमटी स्थानकातच मोटरमन आणि गार्डची लॉबी आहे. त्याच लॉबीसमोर बाकडे टाकून दरवाजे उघडण्यास वाव दिला नाही. याची परिणिती म्हणजे मोटरमन आणि गार्ड लोकलपर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे एक तास मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल बंद होत्या. या घटनेचा व्हिडिओच एबीपी माझाच्या हाती लागल्याने आंदोलकांची पोल खोल झाली.
समिती स्थापन करण्याचे आश्वासन
एकीकडे प्रवासी ताटकळत उभे होते, लोकल सुरू होत नव्हत्या. अखेर संतप्त प्रवाशांनी ट्रॅकवरून चालत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यात मागून आलेल्या लोकलने धडक दिल्याने 2 प्रवाशांचा मृत्यू तर इतर 3 प्रवासी जखमी झाले. याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न आणि या युनियनच्या प्रतिनिधींना केला, मात्र त्यांनी हात झटकले. या संघटनांनी कितीही नाही म्हणाले तरी लोकल थांबल्याने जो खोळंबा झाला आणि प्रवाशांची मृत्यू झाले त्याची जबाबदारी त्यांचीच आहे. यासंदर्भात जी आर पी उपलब्ध व्हिडिओ आणि सीसीटीव्ही यांच्याआधारे आता कडक कारवाई करण्याच्या दिशेने हालचाल करत आहेत. मात्र, मध्य रेल्वेने अजूनही कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट समिती स्थापन करण्याचे आश्वासन मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिले आहे.
अजून कारवाई का नाही, प्रवासी संघटना आक्रमक
याच बाबतीत प्रवासी संघटना मात्र प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. एबीपी माझाने व्हिडिओ द्वारे थेट पुरावाच सर्वांसमोर आणल्याने कर्मचारी संघटनांच्या कृतींची निवृत न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचेच पत्र देण्यासाठी प्रवासी संघटना गेल्या असता मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी त्यांना भेट देखील नाकारली. त्यामुळे, दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या संघटनांनी तसेच जखमी प्रवाशांनी केली आहे. अनेकवेळेस न्याय मागण्यासाठी आंदोलने केली जातात. प्रवासी संघटना रेल्वेच्या अनागोंदी कारभाराचा विरोधात आंदोलन करतात. मात्र, त्यांच्या मूक आंदोलनाला देखील नोटीस बजावली जाते. मग, इतक्या मोठ्या स्थानकात गर्दीच्या वेळी आंदोलन करून प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या आणि मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कर्मचारी संघटनांवर अजूनही कारवाई का नाही असा साधा प्रश्न इथे विचारला जात आहे.
हेही वाचा
पुण्यातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी कायदा काय सांगतो? 21 नाही 42 कोटी भरावे लागणार
आणखी वाचा