
महाराष्ट्रात घरगुती तसेच व्यावसायिक गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र समोर येत आहे. गॅसवर आधारित अनेक उद्योग ठप्प झाल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून ते मोठ्या प्रमाणावर मुंबई सोडून परतत आहेत. गॅस अभावी केवळ अन्नपुरवठाच नाही, तर गॅसवर अवलंबून असलेले असंख्य छोटे-मोठे उद्योग अडचणीत सापडले आहेत. उत्पादन पूर्णपणे ठप्प झाल्याने अनेक कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी, कामगार वर्ग बेरोजगार होत असून त्यांना मुंबईत राहणे कठीण होत आहे. या परिस्थितीचा परिणाम मुंबईतील रेल्वे स्थानकांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. उत्तर भारतीय कामगार मोठ्या संख्येने आपल्या गावी परतण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, ही परिस्थिती आणखी काही काळ कायम राहिल्यास इतर उद्योगांनाही त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण कच्च्या तेलापासून केवळ गॅस आणि पेट्रोलच नव्हे, तर प्लास्टिक, कॉस्मेटिक, डांबर यांसारखी विविध उत्पादने तयार होतात. त्यामुळे गॅस तुटवड्याचा परिणाम व्यापक पातळीवर जाणवू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.