
अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 13 दिवस पूर्ण झाले असून या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत जवळपास दीड तासांचे सविस्तर प्रेसेंटेशन केले. यामध्ये त्यांनी अपघातामागे 100 टक्के घातपाताचा संशय व्यक्त करत तीन ते चार महत्त्वाचे मुद्दे मांडले.
रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार हे कारने प्रवास करणार होते. मात्र पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फोनमुळे त्यांना उशीर झाला आणि त्यानंतर विमानाने जाण्याचा निर्णय घ्यावा लागला, असा दावा त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर “एखाद्या फाईलवर सही घ्यायची होती म्हणून मुद्दाम उशीर घडवून आणला गेला का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, या प्रकरणात व्हीएसआर या विमान कंपनीबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. याशिवाय ‘अॅरो’ नावाच्या हँडलिंग कंपनीची भूमिकाही संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला. पायलट सुमित कपूर यांच्या संदर्भातही काही तांत्रिक मुद्दे मांडत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. रोहित पवार यांनी सांगितले की, आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार हे चार प्रमुख मुद्दे संशय निर्माण करणारे आहेत. मात्र, या सर्व बाबींवर अंतिम निष्कर्ष हा अधिकृत चौकशी अहवालातूनच स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.