
मुंबई : मणिपूरला गेल्यानंतर यांना मोदींना त्या नावातील मणी दिसला, पण तिथल्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू मात्र दिसले नाहीत. राज्यातील शेतकरी अडचणीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र महाराष्ट्रद्वेषामुळे मदत करत नाहीत अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) टीका केली. मराठी भाषेसाठी मी आणि राज ठाकरे एकत्र आहोत, मुंबई अदानीच्या घशात जाऊ देणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. एकीकडे अमित शाह (Amit Shah) देशप्रेमाचं नाटक करतात, पण त्याचवेळी त्यांचा पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतो, ही भाजपची घराणेशाही असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप, नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.
Uddhav Thackeray Dasara Melava Speech : उद्धव ठाकरेंच्या भाषणातील दहा मुद्दे
1.बापाचं देशप्रेमाचं नाटक, पोरगं क्रिकेट खेळतंय
पहलगाममध्ये धर्म विचारून भारतीयांना ठार करण्यात आलं. पण त्याच पाकिस्तानसोबत हे क्रिकेट खेळतात. यांनी क्रिकेटची तुलना युद्धाशी केली हा त्यांच्या निर्लज्जपणा. एकीकडे बाप देशप्रेमाचं नाटक करतोय आणि दुसरीकडे पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतोय, ही यांची घराणेशाही.
2. मुख्यमंत्री 10 व्या क्रमांकावर
मी मुख्यमंत्री असताना कोविड काळात केलेल्या कामामुळे देशात एक नंबरचा मुख्यमंत्री ठरलो होतो. पण आता मुख्यमंत्र्यांच्या कामाची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये योगी आदित्यनाथ हे पहिल्या क्रमांकावर आहेत. तर आपले मुख्यमंत्री दहाव्या क्रमांकावर आहेत.
3. कमळ फुलवण्यासाठी सगळीकडे चिखल
भाजपने आपले कमळ फुलवण्यासाठी सगळीकडे चिखल करून ठेवला, त्यांनी कायद्यांचा दुरुपयोग करून अनेकांना तुरुंगात टाकले. देशभक्त असणारे सोनम वांगचूक एका परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानला गेले म्हणून त्यांना देशद्रोह ठरवण्यात आले. मग गुपचूपपणे पाकिस्तानला जाऊन नवाज शरिफांच्या वाढदिवसाचा केक खाणारे मोदी कोण? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.
4. मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा डाव
मुंबईमध्ये खड्डे पडतात, ट्रॅफिकची समस्या आहे, पण हे भाजपचा महापौर होणार अशी बोंबाबोंग करत सुटले आहेत. आता हिंदू मुस्लिम वाद करून मत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबई यांनी जिंकली तर अदानीच्या घशात घालतील असं म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले.
5. मणिपूरच्या डोळ्यातील अश्रू दिसले नाहीत
गेल्या तीन वर्षांपासून मणिपूर जळत आहे. पण आता पंतप्रधान मोदी त्या ठिकाणी गेले. मणिपूरमध्ये जाऊन दंगलग्रस्त भागातील नागरिकांना धीर देतील असं वाटत होतं. पण हे त्या लोकांना भेटलेच नाहीत. मणिपूरच्या नावात मणी असल्याचा उल्लेख त्यांनी केला, पण तिथल्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू यांना दिसत नाहीत.
6. हेक्टरी 50 हजार रुपये मदत करा
या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री, जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणाले होते. आज म्हणतात की ओला दुष्काळ असा काही प्रकारच नाही. कोणतेही निकष न लावता सरकारने हेक्टरी 50 हजार रुपये जाहीर करावे. आपलं सरकार असताना कर्ज माफी केली होती.
राज्यातील शेतकरी हताश झालाय, तो लढतोय. पण देवेंद्र फडणवीसांचा अजून अभ्यास सुरू आहे. तिकडे पंतप्रधान काहीही मदत करत नाहीत. बिहारमध्ये निवडणुका आल्यानंतर पंतप्रधानांनी तिथल्या महिलांच्या खात्यावर 10-10 हजार रुपये टाकले. पण महाराष्ट्रातल्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला काहीही मदत केली नाही. यांच्याकडे पैसे आहेत, पण महाराष्ट्राबद्दल असलेल्या द्वेषामुळे ते मदत करत नाहीत.
7. हिंदुत्वावरून यांच्या टोप्या सगळ्यांसमोर आणणार
एका बाजूला हे मुस्लिमांना शिव्या देणार, त्यांना देशद्रोही म्हणणार, आणि त्याचवेळी आरएसएसचे मोहन भागवत हे दिल्लीमध्ये मुस्लिम मौलवींची भेट घेणार ही अशी यांची नीती आहे.हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, नाहीतर तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो आम्ही समोर आणू. भाजपने त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग आधी काढावा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवावे.
8. जीएसटी कुणी लावला होता?
मोदींना प्रत्येक गोष्टीमध्ये महोत्सव करायचा आहे. या जीएसटी कुणी लावला होता, नेहरूंनी लावला होता का? आठ वर्षे यांनी लोकांना लुटलं, आता महोत्सव साजरा करत आहेत.
9. सोनम वांगचूक देशद्रोही कसे?
जो लढेल तो तुरुंगात जाईल अशी परिस्थिती आहे. राज्यात जनसुरक्षा कायदा लागू केला, त्याला सर्वांनीच विरोध केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी काहीही कारण सांगितलं. पण सोनम वांगचूक हे देशभक्त, त्यांनी लेह लडाखसारख्या दुर्गम भागात अनेक कामं केली. थंडीत काम करणाऱ्या जवानांसाठी त्यांनी सोलार छावण्या बांधून दिल्या. पाण्याची कमतरता होती त्या ठिकाणी आईस स्तूपच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले. सोनम वांगचूक यांनी लडाखच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू केला. पण मोदींनी त्यांच्यावर रासुका लावला. त्यामुळे अशा कायद्यांचा दुरुपयोग केला जातो. मोदींची स्तुती करेपर्यंत ते देशभक्त होते, आता देशद्रोही कसे झाले.
10. राज आणि मी एकत्रच
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. जिथे मराठीची गळचेपी होणार, मातृभाषेचा विषय येईल त्या ठिकाणी आम्ही सगळं विसरून एकत्र येणार. भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली नव्हती, ती आम्ही मिळवली. आता ही मुंबई कुठल्या व्यापाऱ्याच्या घशात जाणार असेल तर कुणालाही सोडणार नाही.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा