
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. धाराशिवमधल्या ढोकी पंचायत समिती गणातून शिवसेना ठाकरे गटाचे अमर समुद्रे विजयी झाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे अमर समुद्रे हे फक्त एका मतानं विजयी झाले आहेत. अमर समुद्रे यांना 3187 मतं मिळाली असून त्यांनी एका मताने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. भाजपचे निहाल काझी यांनी 3186 मतं मिळाली आहेत. अवघ्या एका मताने त्यांचा पराभव झाला आहे. ढोकी गणात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पहायला मिळत होती. मजमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही उमेदवारांनी श्वास रोखून धरला होता. अखेर अमर समुद्रे यांनी निसटता पण ऐतिहासिक असा विजय पटकावला आहे. भाजपच्या उमेदवाराचं त्यांनी फक्त एका मताने पराभव केला आहे. फक्त एका मताने पराभव झाल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली होती. आधी टपाली मतदानांची मोजणी झाली. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधून मतमोजणी करण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासात हा निकाल पूर्णपणे फिरला आणि अखेर शिवसेना ठाकरे गटाने आपला विजय नोंदवला, तर भाजप उमेदवाराच्या हाती निराशा आली.
धाराशिवमधल्या भाई उद्धवराव शासकीय आयटीआयमध्ये मतमोजणी झाली. जिल्हा परिषदेचे 55 सदस्य आणि पंचायत समितीच्या 110 सदस्यांसाठी ही मतमोजणी पार पडली. 15 टेबलांवर ही मजमोजणी झाली आणि त्यासाठी 150 शासकीय अधिकारी काम करत होते. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी 25 हजार मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. या निवडणुकीसाठी 7 हजार 438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांच्या मुख्य निवडणूक केंद्रात सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी केंद्राबाहेर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.