
गेल्या एका वर्षात शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. आधी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते, त्यानंतर आता शेतमालाला भाव मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडं मोडलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन करत कर्जमाफीची मागणी केली होती. या आंदोलनात अनेक शेतकरी नेते सामील झाले होते. त्यानंतर सरकारने 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता. मात्र सध्या विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक सुरू आहे, त्यामुळे या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, मात्र आता हा प्रश्न सुटला आहे.
शेतकरी कर्जमाफीचा मार्ग मोकळा
शेतकरी कर्जमाफीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे कर्जमाफी संकटात सापडण्याची शक्यता होती.मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी आचारसंहितेतून विशेष सूट दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेली ही कर्जमाफीची योजना आता 30 जूनपूर्वीच अंमलात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
30 जून पूर्वीच घोषणा होण्याची शक्यता
समोर आलेल्या माहितीनुसार, बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर कर्जमाफीची घोषणा झाली होती. सध्या या कर्जमाफीसाठीची पात्र शेतकऱ्यांची पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याची माहिती समोर आली आहे. आता 30 जूनपूर्वी कर्जमाफीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अल्पावधित प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार?
काही महिन्यांपूर्वी सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती. याअंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि बँकेचे कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरील बोजा कमी होणार असून नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजारांची मदत थेट खात्यात जमा केली जाणार आहे.