
मुली आता मुलांपेक्षा कमी नाहीत, हे मोठ्या प्रमाणात सिद्ध होत आहे. आता देखील चार बहिणींनी मोठ्या जिद्देने ऊसतोडणी करणाऱ्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. सख्ख्या चार बहिणी मुंबई पोलीस दलात भरती झाल्या आहेत.
ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील जिवाचीवाडी या गावातील हनुमंत चौरे यांच्या चारही मुली मुंबई पोलीस दलात भरती झाल्या आहेत. चार सख्ख्या बहिणी मुंबई पोलीस दलात भरती झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
जिवाचीवाडी हे डोंगरात वसलेले एक खेडेगाव जिथे ऊसतोड कामगारांच्या मुलींचे विवाह सुरक्षेच्या कारणास्तव बालपणातच लावून दिले जातात, तिथे उषा, अर्चना, गितांजली, शितल या चार बहिणींनी वेगळे उदाहरण निर्माण केले आहे. आई-वडील आजही ऊस तोडीचे काम करतात हालाखीची परिस्थिती असताना चारही बहिणींनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले आहे.
भावूक होत मुलींच्या आई म्हणाल्या, मुली लहान असताना ऊस तोडणीचं काम करायचो. अशी वेळ माझ्या मुलींवर येऊ नये आणि त्यांचं जीवन त्यांनी आनंदाने जगलं पाहिजे.. तेच आज आम्हाला पाहायला मिळालं आहे.
पोलीस दलात भरती झालेली लेक म्हणते, 'त्यांनी ऊसतोडीचं काम केलं. त्यांनी आम्हाला सुविधा खूप कमी दिल्या. म्हणजे. कपडे यांसारख्या वस्तूंवर फार कमी खर्च केला. पण शिक्षणासाठी आम्हाला कोणतीत कमतरता भासू दिली नाही. आता प्रामाणिकपणे काम करत आमचं कर्तव्य करणार आणि याचं श्रेय फक्त आमच्या आई – वडिलांना जातं…'