
सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. तिसरा आणि शेवटचा सामना हा 20 जून 2026 रोजी खेळवला जाईल. या मालिकेत फक्त रोहित शर्मा खेळताना दिसत आहे. विराट कोहलीला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावे लागले. आता यातच पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. ते दोघेही 2027 वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही हा प्रश्न सगळ्यांचा पडला आहे. तर याबाबत आता बीसीसीआयने प्रतिक्रिया दिली आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठीच्या भारताच्या योजनांवर सार्वजनिकरित्या चर्चा करण्यास नकार दिला आहे. संघाच्या दीर्घकालीन आराखड्याबाबतची चर्चा ही एक अंतर्गत बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोहली आणि रोहितच्या भविष्यावर चर्चा
भारताने 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यापासून कोहली आणि रोहित यांचे एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्य चर्चेचा विषय बनले आहे. या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी 2027च्या विश्वचषकानंतरही एकदिवसीय क्रिकेट खेळत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पीटीआयशी बोलताना सैकिया यांनी स्पष्ट केले की, संघाच्या योजना आणि खेळाडूंच्या भविष्याबाबत चर्चा सुरू आहे, परंतु ती सार्वजनिक करण्याचा कोणताही हेतू नाही.
सैकिया म्हणाले, “आमची टीम खूप सुसंघटित आहे आणि आमच्याकडे अनेक तज्ञ आहेत. सर्व हितधारक यात सामील आहेत. क्रिकेट समिती, निवड समिती आणि सपोर्ट स्टाफ, मुख्य प्रशिक्षक आणि संबंधित खेळाडूंसह सर्व हितधारकांच्या सहभागाने सर्व निर्णय घेतले जातात. सतत संवाद सुरू असतो. त्यामुळे, आम्हाला चर्चेसाठी कोणत्याही विशिष्ट सत्राची गरज नाही. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.”
अलीकडे, 2027 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या तयारीमध्ये वरिष्ठ खेळाडूंच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोहित आणि कोहली या दोघांनीही या स्पर्धेत खेळण्याची आपली इच्छा वारंवार व्यक्त केली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भविष्यातील संघाच्या रचनेबाबत कोणतेही ठोस आश्वासन देणे टाळले आहे.
बीसीसीआयच्या मते कोणत्याच खेळाडूला विशेष सवलत मिळणार नाही. विराट आणि रोहितची निवड ही त्यांच्या कामगिरीवर आणि फिटनेसवर आधारित असेल. त्यामुळे दोन्ही खेळाडूला आता आपल्या कामगिरीसोबतच तंदुरस्तीवर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे.