
लक्ष्मण हाके, मनोज जरांगे पाटील Image Credit source: एजन्सी
रामू दखने, टीव्ही ९, प्रतिनिधी: मराठा आरक्षणाबाबतच्या काही मागण्या सरकारने अद्यापही पूर्ण न केल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचे शस्त्र उपसले आहे. 30 मे रोजी ते आमरण उपोषण करणार आहे. तर सरकारने त्यांच्याशी चर्चेला सुरूवात केल्याचे दिसले. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. जरांगेंच्या मागण्या सरकार दरबारी पोहचवणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या घाडमोडीनंतर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी विरोधाचा (Laxman Hake Criticized Manoj Jarange Patil) सूर आळवला आहे. त्यांनी खालच्या भाषेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.
खुळखुळ्या तुला…
जरांगे, खुळखुळ्या तुला अक्कल नावाचा प्रकार नाही अशी जहरी टीका प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांचा खुळखुळ्या म्हणून उल्लेख केला आहे. जरांगे पाटलाकडे जस्टीज येऊन गेले. सचिव येऊन गेले, मुख्यमंत्री येऊन गेले. तरी त्याला फरक पडला नाही आणि तो हॉटेल चालवणारा, झाडूपोछा करणारा जाऊन तिथे फरक पडत असतो का? अशी टीका त्यांनी लाड आणि जरांगे भेटीनंतर केली आहे.
प्रसाद लाड यांच्यावर घणाघाती टीका
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावरही टीका केली. आमदार प्रसाद लाड यांना एक लाख लोकांना रोजगार दिल्याबद्दल शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला असा चिमटा त्यांनी काढला. हॉटेल चालवणारा, झाडूपोछा करणारा माणूस मनोज जरांगेना भेटू फरक पडत असतो का? अशी टीका लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यावर केली.
ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आम्ही ग्रामीण भागात सभा घेत आहोत. आपल्याला बजेट भेटत नाही. मात्र जरांगेंनी आंदोलन जाहीर केलं की त्यांना साडेसातशे कोटीची घोषणा होते. ओबीसींच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून दुजाभाव होत आहे. जातगणना व्हावी या मागणीसाठी आम्ही शंभर सभा घेत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रसाद लाड-मनोज जरांगे भेटीवर टीका
प्रसाद लाड यांनी हॉटेल चालवावं. राजकारणाचा फायदा घेऊन अजून अंबानीच्या पुढे जावं. आरक्षण, जरांगे पाटील यांची मागणी यातील प्रसाद लाड यांना काडीची अक्कल आहे का? असा सवाल त्यांनी केला. तर ज्या पक्षाच्या जीवावर ते बेडकासारख्या उड्या मारतायेत, त्या पक्षाला विचारा माधव काय आहे, अशी बोचरी टीका हाके यांनी केली. भट बामणाच्या पार्टीला वाडी वस्तीवर कोण घेऊन गेले हे विचारा असे हाके म्हणाले. तर मराठा समाजाच्या मागण्यासाठी राजीनामा देण्याचे वक्तव्य काल प्रसाद लाड यांनी केले होते. त्यावर हाके यांनी पहिल्यांदा त्यांनी राजीनामा द्यावा, नंतर त्यांना काय जातीचं काम करायचे ते करावा. त्यांना ओबीसीच्या अन्नात माती कालवायची आहे. ओबीसींच्या मतावर भाजपा सत्तेवर आली आहे, अशी टीका प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केली.