
उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे हे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या यवतमाळ दौऱ्यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. या वेळी त्यांनी यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत तसेच इतर नेतेही उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांबाबत बोलताना सांगितले की, ‘माझ्या शब्दावर जनतेने काहीही विचार न करता या खासदारांना निवडून दिलं, आज त्यांनी लोकांचा विश्वासघात केला; त्याबद्दल मी जनतेची माफी मागणार आहे.’ पुढे ठाकरे म्हणाले, ‘मला खात्री आहे, जे फुटले ते खासदार आणि जे निष्ठावंत राहिले ते माझे कार्यकर्ते; त्यामुळे अशा गद्दारांचे जाणंच योग्य होतं.’
महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमधील नागरिकांना एक सूचना केली आहे. त्यांनी सांगितले की, ‘गद्दारी करणाऱ्या खासदारांनी तुम्हांला आधी विचारलं का? तुमच्याशी विश्वासघात करताना विचारलं का? मग आता तुम्ही त्यांना विचारा की गद्दारी का केली? पुढील तीन वर्षे हाच कार्यक्रम करायचा आहे. कारण जे शिवसेनेतून गेले तर ते गेलेच…’ पुढे ठाकरे म्हणाले, ‘हे ठरलं तर मग या गद्दारांना थेट प्रश्न विचारा…’