Headlines

तीन सख्खी भावंडे… जीवाला जीव देणारे… तिघांचाही एकाच ठिकाणी बुडून मृत्यू; राज्यात एकूण 6 जण बुडाल्याने हळहळ

तीन सख्खी भावंडे… जीवाला जीव देणारे… तिघांचाही एकाच ठिकाणी बुडून मृत्यू; राज्यात एकूण 6 जण बुडाल्याने हळहळ
तीन सख्खी भावंडे… जीवाला जीव देणारे… तिघांचाही एकाच ठिकाणी बुडून मृत्यू; राज्यात एकूण 6 जण बुडाल्याने हळहळ


उन्हाळ्यात तापमानाचा पारा 45 अंशांच्या वर गेला असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेपासून आराम मिळावा यासाठी राज्याच्या विविध भागात अनेकजण पोहण्याचा आनंद लुटतात. अशातच आता पाण्यात बुडून 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावतीत 3, नाशिकमध्ये 2 तर अहिल्यानगर जिल्ह्यात एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमरावतीत 3 सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

अमरावतीच्या वरुड तालुक्यातील पुसली धरणात बुडून तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. मनोहर निमकर यांच्या शेतातील झोपडीत राहणाऱ्या संतुलाल उईके यांच्या पंकज संतुलाल उईके (वय 10) प्रिया संतुलाल उईके (वय 8) पवन संतुलाल उईके (वय 7) यांचा मृत्यू झाला आहे. ही तीनही मुले नरखेड येथील आश्रम शाळेत शिकतात. ही मुले धरणात आंघोळीला किंवा मच्छी मारण्यासाठी गेल्याचा अंदाज आहे, मात्र या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

नाशिकमध्ये दोन चिमुकल्यांचा हौदात बुडून मृत्यू

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील बोरगाव जवळील चिखली येथे हौदात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. दर्शन जगदीश भोये (वय 4) तन्मय निलेश भोये (वय 3) दोघेही भाऊ हे सकाळी दहा वाजेच्या सुमारास घराजवळ खेळत असतांना जवळच घर बांधकामासाठी खोदलेल्या पाणी साठवण खड्यात पडल्याने दोन्ही बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दोन्ही मुले खड्यात पडल्याचे घरच्यांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. पाण्यातून काढून त्यांना तात्काळ उपचारासाठी बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता प्राथमिक अहवालानुसार वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. शवच्छेदनासाठी दोन्ही मुलांना सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‍शवच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळी पसरली आहे.

अहिल्यानगरमध्ये 14 वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू

प्रवरा नदीत बुडून 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार परिसरात घडली आहे. कुटुंबियांसमोरच चिमुकल्याचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. आई वडिलांसोबत नदीवर गेलेला 14 वर्षीय मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीपात्रात बुडाला. दिनेश नितीन जाधव असं या मुलाचे नाव आहे. हा मुलगा बुडाल्यानंतर गायब झाला. राहाता, शिर्डी आणि श्रीरामपुर नगरपालिकेच्या आपत्कालिन विभागाला 19 तासानंतर या मुलाचा मृतदेह मिळाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *